Tuesday, October 6, 2009

एक त्यागमय जीवन : स्वा.सावरकर


आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी वाहून घेतलेल्या स्वा.वि.दा.सावरकर यांनी २६ फेब्रुवारी १९६६ ला प्रायोपवेशनाच्या साधनाने आत्मार्पण केले. सर्व आयुष्यभर त्यांनी एकच ध्येय जपले ते म्हणजे भारतीय समाजाची पारतंत्र्यातून मुक्ती ,देशस्वातंत्र्य! त्यासाठी त्यांनी स्वत"चे स्वातंत्र्यही पन्नास वर्षांसाठी पणाला लावले.
स्वा.सावरकर हे विज्ञाननिष्ठ व नास्तिक होते. जास्त अचूक शब्द वापरायचा तर अज्ञेयवादि होते. कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध होत नाही तोपर्यंत सिद्धांत म्हणून त्यांनी कधीच स्वीकारली नाही. भारतीय योगशास्त्र मात्र त्यांनी विज्ञाननिष्ठ मानले. "कुंडलिनी" ही भारतीय मानसशास्त्राने जगाला दिलेली देणगी आहे असे त्यांचे मत त्यांनी मांडले.आपल्या मनोबलाच्या आधारे त्यांनी अचाट अशी कृत्ये केली. "कि न घेतले व्रत अम्ही अंधतेने, बुद्ध्याची घेतले म्या वाण करी हे सतीचे" या काव्यपंक्ती त्यांच्या नि:स्वार्थ त्यागाच्या प्रेरणेतूनच स्फुरलेले आहे. देशस्वातंत्र्यासाठी लढताना अगदी जाणूनबुजून ,डोळसपणे दु:खाचा- सतीच्या वाणाचा स्वीकार त्यांनी केला."माझी जन्मठेप" या आपल्या आत्मचरित्रातून त्यांनी स्वीकारलेल्या त्यागी जीवनाचा व दु:ख स्वीकाराचा प्रत्यय ठायी ठायी येतो.माझी जन्मठेप मधे ते म्हणतात, "माझ्या या कष्टमय हेतुपूर्वक स्वत:वर कोसळून घेतलेल्या संकटांचे पर्वताखाली चिरडलेल्या आयुष्यात जर कोणता एखादा नियम अतिशय कडु पण अतिशय हितपरिणामी झाला असेल तर तो सदोदित प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरुन त्यास मनाची सिद्धता करुन ठेवणे हाच होय." (पृ. १७ समग्र सावरकर वाड्मय खंड-२ )
पृ.८२ वर तुरुंगाधिकार्याशी झालेल्या संवादात ते म्हणतात, "या त्रासात मी स्वत:हून पडलो हे खरे आहे. कारण त्या त्रासात तसे स्वत:हून पडणे हे मला माझे कर्तव्य वाटले तसेच या त्रासातून शक्यतर सुटणे हे ही कर्तव्यच वाटले. ( समुद्रात उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न)

सावरकर अज्ञेयवादि होते.त्यामुळे यातनांनी खचलेल्या मनाला आत्महत्येपासून परावृत्त करताना सूक्ष्म गोष्टींसंबंधी ते जर-तर च्या भाषेत ते लिहीतात,(पृ. १४०) "...पण अशा रितीने जेथे इतर भक्कम यंत्रे चुरून जातात तेथे गुप्त, अज्ञात यातनांचा मार सहन करण्यात उपयोगी पडावे, ते कार्य त्याचेकडून करुन घ्यावे म्हणूनच हे कर्तृत्वशक्तीचे यंत्र केले नसेल कशावरुन?" गुप्त,अज्ञात यातनांचा उपयोग काय याविषयी ते लिहीतात, "...तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल..." पुढे त्यांच्यातला अज्ञेयवादी लिहीतो, "परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि हि बातमी देखील (स्वत:च्या मृत्युची) देशास कळणार नाही मग त्याचा नैतिक परिणाम कोठला होणार?...त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वत:च्या हाताने करुन आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात भर का घालतोस? " बुद्धीने दिलेले हे कारण मनाला पटल्यावर याच पृष्ठावर सावरकर म्हणतात,"...त्या वेळेस काही घटिका ज्या कार्याचा निदिध्यास लागल्याने मनाने संसाराच्या सर्व सुखांवर लाथ मारली त्या उदात्त कार्याची चर्चा मोकळेपणाने करता आल्याने मन पुन: चैतन्ययुक्त होई. सुप्त तेज पुन: जागे होऊन उठे. सोसले ते अपमान सन्मानच वाटू लागत. भोगलेल्या यातना काहीच नव्हत. भोगावयाच्या आहेत त्याही कर्तव्यच होत हा निर्धार पुन: सबळ होई. ह्या घटिका म्हणजे त्या कोलूच्या कठोर शापातील वरच होत्या."
अंदमानात सावरकरांनी यातनांच्या भीषण कचाट्यातही बंदिवानांमधे शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाचे व्यावहारीक फायदे राजाबंद्यांना पटवून देतानाच ते म्हणत ,"नुसते ज्ञान लंगडे तर नुसते कर्म अंधळे. धर्मकारणाप्रमाणेच राजकारणातही ज्ञानयुक्त कर्म हेच समाजास हितकारक होणारे आहे. तुम्ही सध्या एक सेवात्यागाची, यातना सहन करण्याची निष्क्रीय सेवा करताच आहा. त्याचे जोडीस ....तिला आता ज्ञानदृष्टीचीही जोड देऊन दुहेरी योग्यता अंगी बाणवू."
अंदमानाच्या अंधेर कोठडीत उपयुक्ततावादी सावरकरांनी योग, कुंडलिनी, वेदान्त यांचा उपयोग करुन घेतला.मार्सेलिसला समुद्रातून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यावर मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी आत्मबल नावाचे काव्य रचले आहे. त्यात "अनादि मी अनंत मी" असे स्वत:च्या आत्म्याचे वर्णन करुन घोर निराशेतून मनाला पुन्हा बळ प्राप्त करुन दिले.अंदमानात केलेल्या योगाभ्यासाविषयी सप्तर्षी या महाकाव्यात ते लिहीतात,
‘तो दिवस मावळू ये, मग ज्या होतो धरुनि नियमासी ।
चित्तैकाग्र्यासी मी साधित एकान्त विगत षण्मासी ॥
नियमानुरुप त्या मी चित्तैकाग्री करावया प्रगती ।
पुरती सक्त मजूरीहोतांची की धुवोनि कर मग ती ॥
योगीराजाचा त्या ग्रंथ ‘श्री राजयोग’ मी उघडी ।
शान्त रसाचा पेला दूर करावा गमेचि जो न घडी ॥’
सुरुवातीला मन एकाग्र करणे कठीण. सावरकर म्हणतात,
‘ मन हे चंचल भारी ! दुर्निग्रह भासलेचि साधुजनां ।
जड जीव, अनभ्यस्तचि त्यात अम्ही, आवरेचि ते मज ना ॥’
पुढे चित्त एकाग्र होऊ लागले तेव्हा,
‘ घेता घेता ऐशा वृत्ती ध्यानस्थ चित्ती विलयते ।
ये सुखद अनुभवाया ‘आत्म-रती’चा प्रसाद तिल याते ॥’
अन्तर्जोतीवर चित्त स्थिर झाल्यावर अंधार कोठडिला काय घाबरायचे?
‘तूं अन्तर्ज्योति ! तुला या अंधारात घाबरा? पाहे ।
सुख-दु:खाचे साधन बाह्य न, परि मनात बापाहे ॥
अंदमानातून सुटून आल्यावर "कुंडलिनी व हिंदुधज" या विषयावर त्यांनी रत्नागिरीत तीन व्याख्याने दिली.विज्ञाननिष्ठ सावरकरांनी भाषण करताना म्हटले," बंदिवासात असताना एकट्याची एकांतातली करमणूक म्हणून या संबंधाने मी थोडासा अनुभव घेतला आहे." सावरकरांना योगविद्या अवगत होती. त्यांना काही मंत्रही येत असत. रोज काही वेळ ते ध्यान करत असत याला बर्याच जणांनी दुजोरा दिला आहे. योगशास्त्राला सावरकरांनी संपूर्ण विज्ञानावर आधारीत एक प्रत्यक्ष, प्रयोग,अनुभव व पडताळा घेता येणारे शास्त्र मानले आहे.
धर्मातील कर्मकांडाचे प्रतिक असणारी कुंडलिनी हिंदु ध्वजावर अंकीत करणे ही अंधश्रद्धा नाही काय, या प्रश्नावर बुद्धीवादी सावरकर म्हणाले," हे म्हणणे योग्य नाही. योग ही भारताने सर्व जगाला दिलेली देणगी आहे.आपल्या पूर्वजांनी शरीर आणि मानसशास्त्र याचा सहस्त्र वर्षांपूर्वी एवढा खोल विचार केला होता की, अगदी परमावधी चे आश्चर्य वाटते. योगसाधनेचा विचार हा अगदी विज्ञाननिष्ठ आहे. बंदीशाळेत मी कुंडलिनीचा उबारा अनुभवला आहे."
मात्र आपल्या योगसामर्थ्याविषयी सावरकर फारसे बोलत नसत. हा चर्चेचा विषय नाही असे सांगून याविषयीचे प्रश्न टाळत. आपल्या अनुयायांनी व समाजाने जास्तीतजास्त विज्ञानाभिमुख व्हावे आपल्या बोलण्यातून गैर अर्थ निघु नयेत म्हणून या विषयी मौनच पाळणे त्यांना जास्त पसंत होते.सावरकरांनी आपले सर्व आयुष्य समाजासाठी वेचले. समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर, साहित्यिक, नाटककार,महाकवी ,उत्कृष्ट वक्ता, अनेकांना क्रांतीकार्यात प्रेरक शक्ती ठरलेला अशा विविध भूमिका पार पाडल्यावर वयाच्या ८२ व्या वर्षी सावरकरांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला. आता आपली काही कर्तव्ये राहिली नाहीत. केवळ जगाला व स्वत:ला हा देह भारभूत होऊ नये म्हणून हा बुद्धीने घेतलेला निर्णय होती. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी "आत्महत्या आणि आत्मार्पण" हा लेख त्यांनी प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी संत रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ इ. ची ठळक उदाहरणे दिली. सुरुवातीला समुद्रात देह समर्पित करण्याची त्यांची इच्छा असावी (महायोगी सावरकर : ले. बाळाराव सावरकर) पण आपल्या बरोबर असलेल्यांवर दोष येऊ नये , कायद्याचा त्रास त्यांना होऊ नये या हेतूने तो विचार त्यांनी रद्द केला व अन्न त्याग करुन म्हणजे प्रायोपवेशन करुन आत्मार्पण केले. एका तेजस्वी त्यागमुर्तीचा शेवट दि. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी झाला.
प्रथम प्रकाशन
: मनशक्ती पाठ ऑगस्ट २००९

Wednesday, September 23, 2009

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...

.
लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळे , नागवेकर व सहकारी यांनी गायलेले हे काव्य ऐकताना मनात एक शांत भाव दाटुन येतो. या गाण्याचे शब्द मला ऐकु येतात ते असे,
.
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळेही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळामोती येतावळी काळी वो माय... ॥ धृ ॥
मी काळी, कांचोळी काळी
कासकासोनि ते काळी वो माय
बुंथ काळी ... ॥ १ ॥
एकली पाण्याला, नव जाय साजणी
सवे पाठवा मुर्ती सावळी वो माय
बुंथ काळी... ॥ २ ॥
विष्णुदासनाम्याची, स्वामिनी काळी
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय
बुंथ काळी.... ॥ ३ ॥



.
विष्णुदासनामा हे एकनाथांच्या काळचे ! संत नामदेव महाराज वेगळे !! विष्णुदास म्हणजे विठ्ठलाचे दास. कृष्णाचे काळे रुप संतांना प्रिय होते. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. डांबर काळे असते त्यापासून सर्व रंग निर्माण करतात. सर्व मूळ रंग एकत्र केले की पुन: काळा रंग तयार होतो. यमुनेचे जळ काळे, घागर काळी. जे आणायचे ते काळे ज्यातून आणायचे ते काळे, जो आणतो आहे तोही आता काळाच. आता एवढे झाल्यावर वरपांगी रुप तरी वेगळे कशाला? त्यामुळे वस्त्रे ,अलंकार हे ही सर्व काळेच भासत आहेत. असे असताना परत ‘एकले न जाता मुर्ती दुजी’ बरोबर कशाला? त्याचे कारण जरी सर्वत्र एक रंग झाला तरी भक्तिचा आनंद हवा असेल तर पुन: द्वैत हवेच. या साजणीने कृष्णाला नव्यानेच समर्पित केले आहे. त्याच्या बरोबर एकरुपता असली तरी त्याला सतत बरोबर तर ठेवायचे आहे.. मुंगी स्वत: साखर झाली तर तिला साखरेची गोडी कशी कळणार म्हणून साखरेपासून भिन्न अशी मुंगी होऊन साखर खाण्याचा आनंद ही हवा आहे. काळ्या फळ्यावर काळ्या खडूची रेषा कधी दिसेल का? म्हणून काळ्या रंगावर पांढरा खडू उत्तम. मनात अद्वैताची भावना राखायची पण बाह्यत: मात्र द्वैत ठेवायचे. मुर्ती बरोबर घ्यायची. अद्वैतातून विष्णुदासनामा विशिष्टाद्वैताकडे वळतात पुन:!
.
या विठ्ठलाचे दुसरे नाव पांडुरंग ! म्हणजे पंढुर रंगाचा किंवा श्वेत वर्णी. पांढऱ्या वर्णातही सर्व रंग असतातच. काळा व श्वेत असे दोन विरुद्ध रंग दिसले तरी गुणात्मकरित्या दोन्ही एकसारखेच.
.
ईश्वराशी एकरुप झाल्याची अनुभूती असलेले बरेच संतकाव्य आहे. ‘अवघा रंग एक झाला’ किंवा ‘पाया पडु गेले तव पाऊलचि ना दिसे...समोर की पाठीमोरा न कळे’ हि काही मोजकी उदाहरणे. हे सर्व संत प्रत्यक्षानुभूतीने जगले आपण केवळ शब्दालंकारांचे धनी !

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान - सॄष्टी रचनेविषयी एक तुलना
.
सांख्याची सृष्टी आरंभ आणि रचनेविषयी मतं आणि आधुनिक विज्ञानाशी तुलना करण्याच्या या प्रयत्नाचा उद्देश प्राचीन ॠषींना सर्व आधुनिक विज्ञान माहीत होते असे म्हणण्याचा अजिबात नाही हे आरंभिच स्पष्ट करतो. विज्ञान अधिक व्यापक आहे व ते अधिकाधीक प्रगत होत जाणार आहे. अनेक साधनांची उपलब्धता या प्रगतीला वेगवान करणार आहे. पण आपणास आश्चर्य वाटावयास लावतं ते हे की जड साधनांची कमतरता असतानाही आपल्या प्राचीन ॠषीं आणि तत्वज्ञांनी केवळ पंचेंद्रीयांच्या सहाय्याने पण आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर सॄष्टीच्या उत्पत्ती व रचनेविषयी जी मांडणी केली ती आधुनिक शास्त्रांच्या बरीच जवळ येऊन पोचते.
.
उदाहरण म्हणून सांख्यांचा सत्कार्य वाद व त्यावर आधारीत असलेली सॄष्टीरचना व उत्पत्तीची मांडणी आणि आजच्या विज्ञानातील अणुरचना ,मूलद्रव्ये व त्यातून अनेकविध रूपात निर्माण झालेली सॄष्टी यांची तुलना मनोरंजक ठरेल. सांख्यांचा मूल सिद्धांत असा आहे की या सॄष्टीत नविन असे काहीही उत्पन्न होत नाही.कारण अभावापासून म्हण्जे शून्यापासून फक्त अभाव किंवा शून्यच उत्पन्न होऊ शकेल .म्हणून जगात दिसणार्‍या,उत्पन्न झालेल्या वस्तूंत म्हणजे कार्यात जे गुण दिसतात ते मूळ कारणात अस्तित्वात असल्याच पाहिजेत.हे मत निश्चितपणे न्यायशास्त्राची पुढची पायरी आहे.कारण नैयायिकांच्या मते एका पदार्थाचा नाश होऊन अन्य पदार्थ निर्माण होतो. उदा.बीजाचा नाश होऊन अंकुर आणि अंकुराचा नाश होऊन झाड तयार होते.पण सांख्य मताप्रमाणे अस होत नसून मूळ बिजात असलेल्या द्रव्यांचा हवा आणि पाणि यांच्या संयोगातून अंकुर तयार होतो. शेंगदाण्यातून तेल निघते वाळूतून तेल निघत नाही.याचा अर्थ कारणात असलेले गुणच कार्यात दिसतात,स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत. थॊडक्यात कार्यात जे काही गुण दिसतात ते मूळ कारणातही कोणत्या ना कोणत्या रूपात असलेच पाहीजेत यासच सत्कार्यवाद असं म्हणतात. अर्वाचीन विज्ञानातही कोणत्याही पदार्थाची कितीही रूपांतर झाली तरी सर्व सॄष्टीतील एकंदर द्रव्ये आणि कर्मशक्ती यांची बेरीज कायम राहते.उदा. ऊदबत्तीच जे वजन असत ते ती जळल्यावर राख आणि धुर आणि अन्य सूक्षद्रव्य यांच्या एकत्रित वजना समानच रहात. या मूळ वस्तुमानाच्या सिद्धांताशी सांख्यांचा सत्कार्यवाद मिळताजुळता आहे. हा सत्कार्यवाद सिद्ध झाला असता सॄष्टी शून्यातून निर्माण झाली हा सिद्धांत आपोआपच नष्ट होतो.आज सॄष्टी ज्या अनंत रूपात विकसित झाली आहे त्यामध्ये विविध रूप गुण आकार आहेत पण सत्कार्यवादाप्रमाणे हे सर्व पदार्थ एकाच मूळ द्रव्यापासून विकसित झाले आहेत. वैषेशिकांनीही परमाणू हे जगाचे कारण मानलं पण त्यांना अणूचे द्वयणूक,त्र्यणूक कसे झाले ते सांगता आले नाही. आधुनिक रसायनशास्त्राने शस्त्रशुद्ध पॄथक्करणातून शंभराहून अधिक मूलद्रव्ये शोधून काढली आहेत पण या सर्व मूलद्रव्यांचीही मूळ एकाचएक पदार्थातून निर्मिती झाली असा सिद्धांत आहे. मात्र या सर्व पदार्थातील मूलद्रव्य जरी एकच असलं तरी यात गुण मात्र एकच नसणार कारण सत्कार्यवादाप्रमाणे एकाच गुणापासून भिन्न गुण निर्माण होणे शक्य नाही.पदार्थातील मूलद्रव्य एकच असले तरी विविध गुण आकार ,गंध,काठीण्य एकाच हे एकाच गुणातून निर्माण होणे शक्य नाही. म्हणून सांख्यांनी या एकाच द्रव्याला म्हणजेच प्रकॄती मध्ये तीन गुणांची सिद्धता केली.कारण कोणताही पदार्थ हा अशुध्दतेतून शुद्धावस्थेकडे ,अपूर्णतेतून पूर्णतेकडे जात असतो.तेव्हा तम आणि सत्व हे दोन गुण सिद्ध झाले.तमाकडून सत्वाकडे जाण्याच्या संक्रमणावस्थेतील रज हा गुण सिद्ध होतो.अशा रितीने एकाच पदार्थाची आणि त्रिगुणात्मक प्रकॄतीची सिद्धता झाली. सॄष्टी आरंभापूर्वी हे तीन गुण साम्यावस्थेत असतात. या त्रिगुणात्मक प्रकॄतीतील गुणांत असमानता येऊ लागली की सॄष्टीच्या आरंभाला सुरूवात होऊन विविध रूपं आणि गुणयुक्त पदार्थ आकारात येऊ लागतात.सॄष्टीच्या विनाशानंतर हे गुण पुन्हा साम्यावस्थेत येतात असा सांख्यांचा सिद्धांत आहे.सर्व पदार्थांत सत्व,रज आणि तम गुणांचे मिश्रण असतेच.त्यांच्या मिश्रणाचे प्रमाण जसे जसे भिन्न प्रमाणात होते तसे तसे नवे नवे पदार्थ आणि गुण दॄष्टीस पडू लागतात जे मूलत: एकाच पदार्थातून आणि तीन गुणांतून निर्माण होत असतात.
.
सांख्यांच्या या सॄष्टीरचनेविषयक माहितीनंतर आपण आधुनिक रसायन शास्त्राकडे लक्ष देऊ. अणु किंवा ऍटम हा रसायन शास्त्राचा पाया आहे. रसायन शास्त्राचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचा पाया आहे.रसायन शास्त्राने सूक्ष्म अभ्यास करून अणुची रचना कशी असते ते शोधून काढले. अणु हा मूळ पायाभूत तीन घटकांनी बनलेला असतो. ते घटक म्हणजे न्युट्रॉन्स,प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स! हे तीनही घटक सांख्यांनी सिद्ध केलेल्या त्रिगुणांप्रमाणेच तीन भिन्न गुणांचे बनलेले आहेत.इलेक्ट्रॉन्स हे ॠण विद्युतभारीत,प्रोटॉन्स हे धन विद्युतभारीत तर न्युट्रॉन्स हे कोणत्याही विद्युत भारविरहीत असतात.शास्त्रज्ञांनी जी शंभराहून अधिक मूलद्रव्ये शोधून काढली,ती एका विशिष्ट चौकटीत मांडली जिला पिरीऑडीक टेबल म्हणतात.त्याची मांडणी अशी आहे की त्यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूतील प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या संख्येत असमानता आहे.ही असमानताच या मूलद्रव्यांच्या वेगळेपणाला कारणीभूत झाली आहे. प्रत्येक अणू हा स्थिर होण्याची धडपड करत असतो.जेव्हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समसंख्येत असतात तेव्हा तो अणू धन आणि ॠण विद्युतभारविरहीत होऊन स्थिर होतो. यावरून असं दिसतं की न्युट्रॉन जो भाररहीत आहे,तो सांख्यांच्या सत्व गुणाशी साधर्म्य दाखवतो. इलेक्ट्रॉन जो सतत चंचल आहे आणि अणुकेंद्रातील न्युट्रॉन्स आणि प्रोटॉन्सच्या भोवती कक्षेत पण कोणत्याही दिशेत फिरतो तो तमोगुणाशी सारखेपणा दाखवतो तर प्रोटॉन जो धनभारीत आहे तो रजोगुणाशी संबंध दाखवतो. थोडक्यात या तिघांची अणुतील अंतर्गत समसंख्या अणुला स्थिर बनवते. हि संख्या विषम झाली तर इतर अस्थिर अणुंशी बॉन्डींग करून नव्या भासणार्या गुणांचा रूपांतरीत नवा पदार्थ तयार करते.उदा.सोडीयम क्लोराइड . एकाच मूलद्रव्यातील अणूरचनेतील प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स ची असमान संख्या भिन्न भिन्न मूलद्रव्ये तयार करते. न्युक्लीअर केमिस्ट्री अजूनही सूक्ष्म आहे.जसे हायड्रोजन च्या अणूची भिन्न रचना किंवा ऍन्टी मॅटर्स हे अपवाद.पण या अपवादांशी आपल्याला आत्ता कर्तव्य नाही.विज्ञान अजूनही प्रगत होईल आणि नवनवे निष्कर्षही निघतील.पण कोणतीही सूक्ष्मदर्शका सारखी भौतिक साधन नसतानाही भारतीय तत्वज्ञांनी केवळ बुद्धिच्या आणि प्रतिभेच्या बळावर न्युक्लिअर केमिस्ट्रितील तत्वांशी मोठया प्रमाणात मिळताजुळता सिद्धांत मांडला होता तोही उण्यापुर्या ३००० वर्षांपूर्वी. त्याचप्रमाणे विज्ञान हे जडाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तर सांख्य किंवा तत्वज्ञानं ही जडापलिकडील तत्वांचा शोध घेणारी असल्यानं जडाचा अभ्यास हा दुय्यम स्वरूपात आला आहे.
.
प्रथम प्रकाशन
मनशक्ती डिसेंबर २००८

Tuesday, September 22, 2009

वृत्तविचार

वृत्तविचार
मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न !
काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत
१. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद
.
१. अक्षरगणवृत्ते:-
.
प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात.
१. लघु किंवा ऱ्हस्व व
२. दीर्घ किंवा गुरु
लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत.
"ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील,
ख,खि व खु ही लघु अक्षरे तर खा, खी, खू , खे, खै, खो, खौ , खं व ख: ही गुरु अक्षरे होत.
.
लघु अक्षर गुरु कधी होते?
.
१. अनुस्वार किंवा विसर्गाने युक्त असल्यास
.
२. लघु अक्षरापुढे जोडाक्षर असल्यास आणि ते उच्चारताना आघात द्यावा लागल्यास
.
३. ते लघु अक्षर चरणातील शेवटचे अक्षर असल्यास.
.
अक्षरगणवृतातील काव्यरचनेतील क्रमाने येत जाणाऱ्या तीन अक्षरांच्या प्रत्येक गटाला गण म्हणतात. गुरु अक्षर व लघु अक्षर यांच्यातील वेगवेगळ्या रचनेप्रमाणे एकूण आठ गण पडतात. ते य र त न भ ज स म असे. ते लक्षात रहाण्यासाठी त्याची मांडणी पुढील कोष्टकाप्रमाणे लक्षात ठेवता येईल.

१. य = आद्य लघु ( U _ _ )
२. र = मध्य लघु ( _ U _ )
३. त = अन्त्य लघु ( _ _ U )
४. न = सर्व लघु ( U U U )
५. भ = आद्य गुरु ( _ U U )
६. ज = मध्य गुरु ( U _ U )
७. स = अन्त्य गुरु ( U U _ )
८. म = सर्व गुरु ( _ _ _ )
.
अक्षर गण वृत्त्तात गण कोणते या बरोबर यती महत्वाचे आहेत.
.
उदा. शार्दुलविक्रीडिताचे नियम ,
अक्षरसंख्या = १९
यति = १२
गण - म स ज स त त ग
.
म्हणजे प्रत्येक ओळीत १९ अक्षरे असतात. यती १२ व्या अक्षरावर यावा व अक्षरांचा संच म स ज स त त ग असा असावा. पहिल्या सहा गणांची १८ अक्षरे व शेवटचे ग म्हणजे गुरु अक्षर.
.
यती म्हणजे काव्य गाताना येणारे विश्रांती स्थान.शब्द किंवा चरण संपताना तो यावा. क्वचित यतीभंग होतो. मात्र तो चुकीच्या ठिकाणी येऊन हास्यास्पद होणारा नसावा. कवितेतील भाव ही नित्य रहावा.
.
शार्दुलविक्रीडीत ची एक ओळ घेऊन उदाहरण स्पष्ट करु. ( चाल मंगलाष्टकांची)
.
चाले ज्या वरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी
.
चालेज्या / वरती / अखंड / स्तुतिचा / वर्षाव / पत्रातु/ नी
म / स / ज / स / त / त / गुरु
.
चाले ज्या वरती अखंड स्तुतिचा येथे "चा" या बाराव्या शब्दावर यती आला आहे.
शार्दुलविक्रिडीत चे एक माझे स्वरचित उदाहरण पाहू,
.
"तारे पाहुनिया नभी मन कथी, ते रत्नभांडारही ।
देवाचे विखरे सुवैभव खरे, माना कुबेरागृही ॥ "

इंद्रवज्रा हे अन्य एक वृत्त पाहू.
चरणसंख्या - ४
अक्षरसंख्या - १२
यति - ५ व्या अक्षरावरगण - त त ज ग ग
.
दु:खी जगा दूखुनिया द्रवे ते
सच्चीत माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्र वज्रासहि लाजवीते
.
भुजुंगप्रयात या वृत्तप्रकाराचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे मनाचे श्लोक. रामदास स्वामींच्या काळी पीर,तकियांचे व फकीरांचे प्रस्थ माजले होते. त्यांच्या करीमांना तोडीस तोड उत्तर म्हणून रामदासांनी भुजंगप्रयात मधे मनाचे श्लोक रचले व त्याचा खेडोपाड्‌यातील समाजमनावर फार अनुकूल परिणाम झाला.पीर फकिरांचे करीमा व मनाचे श्लोक यांचे यथायोग्य तुलना होऊन महाराष्ट्र धर्माचे रक्षण झाले.करीमा मधे भुजंगप्रयात चे "य" गणातील शेवटचे गुरु अक्षर नाही एवढाच दोन्हीत फरक.
.
भुजुंगप्रयात:-
चरणसंख्या - ४
यति - ६,१२
गण - य य य य
.
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघू नायका मागणे हेचि आता

* उपजाती :- हे नाव दोन वृत्तांच्या मिश्रणास देतात. पुढे इंद्रवज्राउपेंद्रवज्रा चे उदाहरण आहे,
.
हा जातिविध्वंसन काल आला (इंद्रवज्रा)
समानतेच्या उभवा ध्वजाला (उपेंद्रवज्रा)
राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी (इंद्रवज्रा)
न जाति तो वा उपजाति मानी (उपेंद्रवज्रा)

इंद्रवज्रा - त त ज ग ग यति ५ अक्षरसंख्या ११
उपेंद्रवज्रा - ज त ज ग ग यति ५ अक्षरसंख्या ११
.
मात्रा किंवा जातिवृत्ते :-

मात्रा वृत्त या प्रकारात लघु व गुरु अक्षरांचे गण न पाडता त्यांच्या मात्रा मोजून त्या मात्रांच्या संख्येचे गट पाडले जातात. लघु अक्षरासाठी एक मात्रा तर गुरु अक्षरासाठी दोन मात्रा मोजल्या जातात.उदा. पादाकुलक या मात्रावृत्तामधे आठ + आठ असे गट केले जातात.
हिरवे हिरवे / गार गालिचे १+१+२ १+१+२ / २+१+२+१+२हरित तृणांच्या / मखमालीचे
पतितपावन किंवा चंद्रकांत मात्रावृत्त :-
यात ८ + ८ + ८ + २ = २६ अशा एकूण २६ मात्रा असतात .
पतीतपावन / नाम ऐकुनी / आलो मी द्वा/ रा
१ +२+१+२+१+१ / २+१+२+१+२ / २+२+२+२/ २
पतीतपावन / नव्हेसि म्हणुनी /जातो माघा/रा
२. सुनील नभ हे, सुंदर नभ हे, नभ हे अतल अहा
सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलचि हा
.
चरणामधे दोन,चार,पाच,आठ इ. मात्रांचे गट पाडल्यामुळे लयबद्ध अशी आवर्तने निर्माण होतात. अशा गटांना खालीलप्रमाणे नावे देण्यात आली आहेत.
.
१. पद्मावर्तनी - आठ मात्रांचा गट
२. अग्न्यावर्तनी - सात मात्रांचा गट
३.भृंगावर्तनी - सहा मात्रांचा गट
४.हरावर्तनी - पाच मात्रांचा गट
५. कवठ निंब - चार मात्रांचा गट
.
फटका :- ८ + ८ + ८ + ६
उदा.
१. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको ॥
.
२.हिंदूनृपती सिंधूनृपती पराजीत तो दाहीर
परसत्तेचा कलंक माथी सर्वै वदती शाहीर ॥
.
दोन चरणात भिन्न मात्रा असलेले एक उदाहरण

केशवकरणी :-
चरणसंख्या - २ पहिल्या चरणात मात्रा - २७ दुसऱ्या चरणात मात्रा - १६
.
१.केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा ।
तयाचा सकल जनांवर ठसा ॥
२.खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या ॥
.
अपूर्ण
क्रमश:

Wednesday, September 2, 2009

Savarkar, Rashbehari and Subhashchandra Bose

गुप्त क्रांतीकारी चळवळींनंतर उघड लोकशाहीचे राजकारण करतानाही सावरकरांनी खुलेआम ब्रिटीश विरोध केला. लोकशाही आंदोलनात भाषणे, लेख आणि लोकचळवळी ऊभाराव्या लागत्तात. वर लिहिल्या प्रमाणे महायुद्ध काळात आणि फारशी मोठी कार्यकर्त्यांची संख्या नसल्याने सावरकरांना "चळवळ" अशी उभारता आली नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी ब्रिटीशांना विरोध केला नाही. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हिंदु पक्षाचे धोरण त्यांनी ठरवले. सप्टेंबर १९३८ च्या "हिंदुस्थान नि झेकोस्लोव्हाकीया" या विषयावरील भाषणात ते म्हणाले," ....आज जपान प्रबळ आहे.आता तो चीनमधे त्याचे राज्य वाढवतो आहे. अशा परिस्थितीत चीन चांगला की जपान चांगला हे ठरवताना आपल्या देशाचा हिताचा कोण हाच मुख्य कस लावला पाहिजे. आमच्या स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा शत्रू बनून जर जपान आपणाला सहाय्य करणार असेल तर आपण त्याच्याशी मैत्री करणेच राष्ट्र हिताचे ठरेल."हिंदुंनी कोणत्या अटिंवर ब्रिटीश सैंन्यात भरती व्हावे याविषयी सावरकर म्हणतात,
१. भावी संघराज्यात सर्व भारतीय सैनिकांवर फक्त भारतीय अधिकार्यांचाच अधिकार चालावा.
२ . भारतीय सैन्याला सर्व सैनिकी शाखांचे शिक्षण मिळावे.
३. भारतीय युवक आपल्या देशाच्याच संरक्षणासाठी सैन्यात भरती होतील, ब्रिटीश लोकशाहीच्या संरक्षणासाठी नव्हे.
.
आझाद हिंदचे संशापक रासबेहारी बोस यांच्याशी सावरकरांचा पत्रव्यवहार सुरु झाला तो दुसरे महायुद्ध सुरु होईपर्यंत चालू होता. पहिल्या पत्राचा दिनांक होता २९-१२-१९३७. त्यात रासबेहारींनी सावरकरांची मुक्त कंठाने प्रशंसा केली व त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयक जाणकारीची विशेष प्रशंसा व कौतुक करुन सावरकर हि भारतीय स्वातंत्र्यासाठी एक महत्वाची अंत्रगत आशा आहे असे लिहीले. सावरकरांनी सुचवल्याप्रमाणे रासबेहारिंनी हिंदुमहासभेची जपान शाखा स्थापन केली.२२-०९-१९३९ ला रासबेहारींनी आपल्या पत्रात सावरकरांना दुसर्या महायुद्धाविषयक धोरणाला पूर्ण पाठींबा दिला. याच पत्रात आझाद हिंद सेनेच्या या संस्थापकाने शंका व्यक्त केली की, गांधीजी भारतातील ब्रिटिश रक्षकदलाचे सर्वात मोठे सहाय्यक असावेत.
.
गुप्त चळवळींशिवाय सावरकरांनी किंवा हिंदुमहासभेने ब्रिटीशांविरुद्ध काय केले? हा प्रश्न चुकीचा आहे कारण सावरकरांनी हिंदुसभेची सूत्रे हातात घेतल्यावेळी स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ बदलले होते. ब्रिटीश सत्ता हळू हळू जाणार हे उघड होत होते. भागानगर संस्थानात ९०% हिंदुंना केवळ १० % जागा मिळत तर १० % मुसलमान ९०% जागा बळकावून बसले होते. त्याविरुद्ध सावरकर व हिंदुसभेने पहिले आंदोलन उभारले. यावेळी कॉंग्रेसचे आंदोलनही चालू होते. हिंदुसभेला अपशकून करायचा म्हणून कॉंग्रेसने आंदोलन स्थगीत केले. हिंदुसभेने एकट्याच्या बळावर (आर्य समाज व काही प्रमाणात शीखांच्या मदतीने) हा लढा तडीस नेला. यानंतर लगेच दुसरे महायुद्ध सुरु झाले. यानंतरचे बहुतेक राजकारण अखंड हिंदुस्तान विरुद्ध फाळणी साठीचा होता प्राधान्य त्यालाच होते. चले जाव चळवळ कोणत्याही प्रकारे गांधीजी कींवा कॉंग्रेसच्या हातात नव्हती. या चळवळीत गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे चळवळ नव्हती. असती तर असहकार चळवळीप्रमाणे हि चळवळ ही महात्म्याला मागे घ्यावी लागली असती कारण हिंसाचार होत होता. सावरकर हिंदुसभेच्या अध्यक्ष पदावरुन १९४३ ला निवृत्त झाले तेव्हाही युद्ध चालूच होते. या कालावधीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र भारत कसा असावा आणि यादवी कशी टाळावी याचेच राजकारण करत होता. फक्त सावरकर पक्ष हिंदुंसाठी राजकारण करत होता कारण हिंदु मतांवर निवडून येणारा कॉंग्रेस पक्ष हिंदुहित खुशाल वार्यावर सोडून देत होता. मुद्दा एवढाच की सावरकरांच्या काळात राजकारणाची दिशा आणि उद्दीष्टे बदलली होती. सावरकरांनी या काळात ब्रिटिशांविरुद्ध कोणती चळवळ उभारली हा प्रश्न त्यामुळे गैरलागू आहे. अखंड हिंदुस्थान साठी जो लढा सावरकर पक्षियांनी दिला त्याला तोड नाही. तो सर्व भारतीय स्वातंत्र्यासाठीच होता. ब्रिटीशांच्या तोडॊ भारत च्या विरुद्धच लढला होता. ब्रिटीश जाऊन त्या जागी अल्पसंख्य मुसलमानांचे राज्य बहुसंख्य हिंदुंवर येऊ नये याचसाठी होता.
बोस यांचे अन्य राजकारण चालु होते त्या कितीतरी आधीपासून सावरकर कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातून रासबेहारी ,आझाद हिंद आणि भारतीयांचे सैनिकीकरणाचे धोरण आखून व्यूह रचत होते. याची थोडी माहिती वर आलीच होती. याउलट सुभाषचंद्र बोसांचा प्रवास सावरकरांच्या भेटिपूर्वी आझाद सेनेच्या दिशेने स्पष्टपणे दिसत नाही. सुभाष चंद्र हे वृत्तीने क्रांतीकारीच होते. सशस्त्र क्रांतीचेच पुरस्कर्ते होते. कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर ते देशव्यापी चळवळ उभारण्यासाठी पाठिंबा मिळवण्यास दौर्यावर निघाले. महाराष्ट्रात हेडगेवारांना भेटावयास गेले मात्र ते अत्यवस्थ होते. तेथून ते डॉ. आंबेडकरांना भेटले त्यात काही निष्पन्न झाले नाही. जीना यांनी तुम्ही हिंदुंचे प्रतिनिधी नाहीत तेव्हा तुम्ही आधी सावरकरांना भेटा असा सल्ला दिला. सावरकरांनी त्यांना रासबिहारींचे पत्र दाखवून सुभाष चंद्रांमधे मूळातच असलेल्या तळमळीला निश्चित दिशा देण्याचे देशकार्य पार पाडले. त्यांची २३ व २४ जून १९४० ला सावरकर सदनात दोन दिवसात मिळून ६ तास झालेली चर्चा हेच सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेने च्या मार्गाचे कारण ठरले. रासबेहारी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या मधील कडी सावरकर त्यांचे राजकीय धोरण आणि प्रेरणा हीच होती. रासबेहारी व सावरकर यांच्यातील पत्रव्यवहार जर भविष्यात सध्या उपलब्ध आहे त्यापेक्षा जास्त उघड झाला तर अजून काही गोष्टी सापडू शकतील. गांधीजींच्या खूनाच्या वेळी सावरकर-रासबेहारी पत्रव्यवहार शासनाने जप्त केला होता असे कळते. तो सध्या कोठे आहे. रासबेहारींचे काही लेखन जपान सरकारच्या ताब्यात आहे का इ. गोष्टींचा शोध घेणे गरजेचे आहे.
.
युद्धाविषयी हिंदुसभेचे अध्यक्ष म्हणून सावरकरांनी धोरण सप्टेंबर १९३९ ला मांडले. त्याची अधिक माहिती नंतर. पण त्यात सावरकरांनी देशस्वातंत्र्याविषयी लिहिले, दोन साम्राज्यांचे युद्ध चालू असताना परतंत्र देशापुढे पहिला पर्याय असतो तो म्हणजे सशस्त्र क्रांती. पण सध्या आपण असंघटित, नि:शस्त्र असल्याने सशस्त्र राष्ट्र्रीय उठाव अशक्य आहे. दुसरे असे की हिंदुसभेच्या किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या प्रकट अधिवेशनात या मार्गाची चर्चा करणे योग्य नाही. ....वेळेच्या अभावी अहिंसक मार्गाची च्वर्चा करता येणार नाही पण एवढेच सांगतो, की संपूर्ण अहिंसा हा अपराध असून सापेक्ष अहिंसा हा सद्‌गुण आहे. जैन आणि बौद्धांची सापेक्ष अहिंसा ही गांधीजींच्या अहिंसेपेक्षा पुष्कळच वेगळी आहे. म्हणून जैनांमधील पराक्रमी स्त्री-पुरुषांनी लढाया मारुन राज्ये निर्माण केली.हिंदुसभेच्या प्रचाराने दुसर्या महायुद्धात सैंन्यात हिंदुंचे प्रमाण ६६ % पस्र्यंत गेले .त्यापूर्वी पर्यंत मुसलमान सैंन्यात ७५ % झाले होते. युद्धासंबंधी चे फायदे विशद करुन सावरकरांनी विचारले, घोषणा करुन तुरुंगत जाऊन पडायचे धोरण हिंदुसभेचे नाही. सैनिकीकरण व औद्योगिकरण हे सध्या फायदेशीर असल्याने तेच हिंदुसभेचे धोरण आहे जेव्हा कायदेभंग नागरी प्रतिकार ,चळवळ फायदेशीर असेल तेव्हा हिंदुसभा ती चळवळ हाती घेईल. ब्रिटीश कण्हत कुंथत का होईना स्वत:च्या गरजेसाठी भारतीयांच्या हातात शस्त्र देऊ करत होते त्याचा फायदा घ्यायला सावरकर हिंदु तरुणांना सांगत होते. हे सर्व धोरण देश स्वातंत्र्याच्या लढ्याचाच भाग होते.

" Veer Savarkar " by Dhananjay Keer" मधून

It is an open secret that Subhash, the devotee of Shivaji and his politics, had discussed the Indian political and international situation respecting World War II with Savarkar at Savarkar Sadan, on June 22,1940, six months before his dramatic disappearance from India in January 1941. in the course of the discussion Savarkar, the Indian Mazzine, inspired Subhash Bose, the Indian Garibaldi, with the idea of an armed revolution from outside in order to intensify the struggle for Freedom. The born general in Subhash took the cue, and played the role of Indian Garibaldi, rightly called the Netaji of the Indian National Army, which was founded by Ras Bihari Bose in the East.After Bose’s mysterious disappearance, Savarkar issued a statement in which he, unlike other statemen, said: “ May the gratitude, sympathy and good wishes of a Nation be a source of never-failing solace and inspiration to him wherever he happens to be! Wherever he happens to be, I have no doubt, he will continue to contribute his all, even health and life to the cause of Indian Freedom.”A world-famous veteran revolutionary and a man of great mental force and a powerful pen ,Ras Bihari Bose, who was the guide and sole adviser of Azad Hind Government of Subhash Bose, was in correspondence with Savarkar till the outbreak of World War II. He was also president of the Japan Hindu Sabha and had immensely contributed through the Indian League of Independence to the forces of the Indian Freedom Movement outside the India. Netaji Subhash. The I.N.A. and India owe a debt of deep gratitude to Ras Bihari Bose. Another great figure of Indian revolution.

The leader and the founder of the I.N.A. both addressed special message to Savarkar on the Radio. In the message Netaji Bose said on June 25, 1944, at night on Singapore Radio: “When due to misguided political whims and lack of vision almost all the leaders of the Congress party are decrying all the soldiers in the Indian Army as mercenaries, it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youth themselves provide us with trained men from which we draw the soldiers of our Indian National Army.” (Ras Behari Bose’s message to Savarkar quoted in Indian Independence League’s publication)

Ras Behari Bose said in his Radio talk addressed to Savarkar: “ In saluting you I have the joy of doing my duty towards one of my elderly comrade-in-arms. In saluting you, I am saluting the symbol of sacrifice itself.” Paying homage to Savarkar’s unexampled sacrifice, untold sufferings and matchless courage, he further said: “ I can see God’s divine hand clearly behind your unconditional release. You have once more proved your real greatness by propagating the theme that our politics must never depend upon the foreign politics of others. England’s enemy must be our friend.” (Free Hindustan., 27 January 1946)

Ras Bihari concluded with Bande Mataram, reiterating his belief that Savarkar’s leadership was the greatest hope inside India. Is any further evidence necessary to prove that the very I.N.A. movement, which Savarkar’s opponents exploited, was the outcome of his ideology, policies and his great book on `1857’, which provided the I.N.A. with slogans, battle cries and vision. And inspired them to fight the battle of freedom? He was the spiritual father of the I.N.A.

As a typical of revolutionary leaders, Savarkar talked very slowly about his personal and home matters. To him secrete were treasures. He was too great a veteran revolutionary leader. None could screw out from him what Dr.Schatt, the German Finance Wizard, told him on the eve of the outbreak of World War II, nor the source he received the letters of Ras Bihari Bose from Japane during the cource of World War II, nor the full details of his meeting with Subhash Bose.

सुभाषचंद्र बोस जपानला पोचण्यापूर्वीच दि.१६-१-१९४२ ला भारतीय स्वातंत्र्यसंघाची शाखा स्थापन हौन ग्यानी प्रीतमसिंग. मोहनसिंग व मेजर फुजिवारा यांच्या नेतृत्वाखाली ५०००० हिंदी सैनिक लढण्यास सिद्ध झाले. जपान हिंदुसभेचे अध्यक्ष आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबेहारी बोस यंच्यातला पत्रव्यवहार मुंबईच्या वरळीच्या बौद्ध विहारातील भिक्षूंमार्फत चालत असे. रासबेहारींनी जपानी भाषेत सावरकरांचे एक विस्तृत चरित्रही लिहीले. एक लेखही लिहीला आहे व त्यावर Savarkar : Rising Leader of New India: His Career and Personality: by Rash Behari Bose : March 1939 ) असा मथळा आहे.
.
दि.२५ एप्रिल १९४१ ला सुभाषचंद्रांनी आपण जिवंत असल्याचे बर्लिन नभोवाणीवरुन प्रकट केले. २१ मार्च १९४२ ला रासबेहारींनी सावरकरांना उद्देशून भाषण केले. त्यात सावरकरांची स्तुती आणि सहकार्याची अपेक्षा तर गांधी प्रभ्रुतींना उद्देशून भाषण केले .दोन्ही भाषणात फार मोठे अंतर आहे.क्रिप्स भेटीसाठी जाताना सावरकरांनी प्रकट केले की " भारताचे स्वातंत्र्य ही आता कोणी द्यावयाची गोष्ट नसून ती भविष्यात घडणारी अटळ घटना आहे."
.
सावरकरांनी सुटून आल्यावर ब्रिटिशांविरुद्ध काय केले असा प्रश्न विचारण्याच्या डोळ्यासमोर सविनय कायदेभंग, असहकार, दांडी यात्रा इ.सारखी आंदोलने तुलनेसाठी असतात किंवा सशस्त्र आंदोलन तरी असते. १९३७ पर्यंत सावरकरांना राजकारण करायची बंदी होती. गांधीजी व कॉंग्रेसप्रणित राष्ट्रकार्य म्हणजे ब्रिटीशांना विरोध करुन जमाव जमवून घोषणा देऊन विरोध करणे, त्यांच्याशी असहकार करणे व परिणामस्वरुपी तुरुंगात जाऊन बसणे हा होता. याउलट सावरकरांच्या दूरदृष्टीला या गोष्टी देशभक्तीच्या पण आचरट अहिंसेमुळे निरुपयोगी वाटत होत्या. नि:शस्त्र प्रतिकारापेक्षा सशस्त्र क्रांतीवर विश्वास असला तरी प्राप्त परिस्थितीत असंघटीत व नि:शस्त्र असल्याने तोही मार्ग बंद होता. अशा परिस्थितीत दुसर्या महायुद्धाची संधी त्यांच्या दूरदृष्टिने साधली. इंग्रज नाईलाजाने भारतीयांच्या हातात शस्त्रे देत आहेत यासारखी सुवर्णसंधी अन्य कोणती येणार होती? त्यामुळे सैनिकीकरण हे हिंदुमहासभेचे धोरण म्हणून त्यांनी नेमून दिले. थोडक्यात तुरुंगभरती पेक्षा सैंन्यभरती हे सध्या सर्वात श्रेष्ठ असे राष्ट्रकार्य आहे असे त्यांना निश्चितपणे वाटले. पण अद्यापही त्यांची ही दूरदृष्टी काही जणांच्या लक्षात येऊ नये आणि त्यांनी तावातावाने सावरकरांनी मुक्तता झाल्यावर ब्रिटीशांविरुद्ध काय केले असे तावातावाने विचारावे हे दुर्दैवच आहे. स्वातंत्र्य मिळवायचे ते केवळ इंग्रजांपासून का अन्य राष्ट्रद्रोही व फुटीरतावादी शक्तींपासूनही असा खरा प्रश्न होता. त्याचबरोबर हे स्वातंत्र्य टिकवायचाही महत्वाचा मुद्दा सावरकरांसमोर होता. त्याचे उत्तर सैनिकीकरण आणि फुटिरतेला उत्तर म्हणून हिंदुराष्ट्रवाद हेच उत्तर होते आणि तेच त्यांनी ध्येय मानले.
.
भागलपूरचा लढा
.
सावरकरांच्या अध्यक्षतेच्या कारकीर्दीत हिंदुमहासभेचा सर्वात मोठा लढा "भागानगरचा नि:शस्त्र प्रतिकार" हा होता. निजामाच्या संस्थानात हिंदुंवर अन्याय होत होता. त्यांच्या मुक्तीसाठी हा लढा दिला गेला. सुमारे १९८० नंतर शासनाने हा लढा स्वातंत्र्याचा लढा म्हणून मान्यता दिली व या लढ्यात लढलेल्या हिंदुसभा व आर्यसमाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिली व निवृत्ती वेतनही लागु केले. त्यामुळे हा लढा सावरकरांनी सुटुन आल्यानंतर स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अप्रत्यक्ष प्रतिकाराचे एक उदाहरण समजले जाते. हा लढा लोकशाहीच्या रक्षणासाठी व लोकांच्या न्याय्य हक्क्कांसाठी दिलेला लढा होता. कदाचित निजाम संस्थानाविरुद्ध असल्याने काहिंना तो ब्रिटीशांविरुद्ध वाटत नसला तर दुसरे उदाहरण म्हणजे हिंदुमहासभेने "भागानगरचा लढा" हा सर्वस्वी ब्रिटीश सरकारविरुद्ध दिलेला लढा होता. बिहाराधील भागलपूर येथे हिंदुमहासभेचे अधिवेशन होते व ब्रिटीश सरकारने अधिवेशनावर बंदि घातली. बिहारचे राज्यपालांशी (मि.स्टुअर्ट) पत्रव्यवहार झाल्यावरही शेवटी ब्रिटीश सरकारने या अधिवेशनावर बंदी घालताच सावरकरांनी "भागलपूरचा लढा" करण्याची सिद्धता केली. या नि:शस्त्र प्रतिकाराची रुपरेखा ठरवण्यात आली. त्यात १०-१० कार्यकर्त्यंच्या गटाने भागलपूर मधे प्रवेश करणे,, भागलपूर बंदीचा निषेध करणार्या तारा व्हाईसरॉय कडे पाठवणे, भागलपूर किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यत जेथे हिंदुसभेचे प्रतिनिधी पोचले असतील तेथे प्रभातफेर्या काढून,सभा घेऊन अधिवेशनाच्या कामाला सुरुवात करावी, सर्वांनी एकाच जाग अटक करुन न घेता वेगवेगळ्या ठीकाणी अटक करवून घेऊन घोषणा देऊन जागृती करुन अटक करुन घ्यावी, जे पकडले न जातील त्यांनी वृत्तपत्रे व अन्य माध्यमांतून या घटनांचा प्रचार करावा इ.इ. सावरकर आपल्या कार्यकर्त्यंबरोबर रेल्वेने निघले. त्यांना "गया " स्थानकात अटक करण्यात आली.सावरकरांना गयेच्या तुरुंगात बंदिस्त केले गेले. ठरल्याप्रमाणे जे प्रतिनिधी तुकड्यांनी भागलपूरात पोचले त्यांनी ठरल्याप्रमाणे अधिवेशन सुरु केले.भागलपूरात ठिकठिकाणी सभा/भाषणे केली गेली. या सर्वांत अकाली दलाचे मास्टर तारासिंग,, नथुराम गोडसे, इंदुरचे दुबे, नागपुरचे नरदेव आर्य, बंगालचे नरेंद्रनाथ दास इ. नेते होते.
.
ब्रिटीश शासनाची हि बंदि सावरकर प्रणित हिंदुमहासभेने मोडून काढली. अधिवेशनाच्या वेळापत्रकात ठरलेल्या शेवटच्या दिवशी बंगाल हिंदुसभेच्या नरेंद्रनाथांनी समारोप केला. हिंदुसभेवरील अन्याय्य बंदिविरुद्ध पोलिस दलातही जागृती होऊन श्री. भोलाप्रसाद व विदेश्वरसिंग या दोन पोलिसांनी पोलिसदलाची त्यागपत्रे दिली. या अधिवेशना विषयी अनेक वृत्तपत्रांत सरकार ला दोष देणारी माहिती व सावरकरांच्या नेतृत्वाची स्तुती छापून आली. सरकरचा धिक्कार केला गेला. बिहारमधील "सर्च-लाईट" या डॉ.श्री.राजेंद्रप्रसाद यांच्या वृत्तपत्राने लिहीले," भागलपूरला शासकीय सिद्धतेचा धुव्वा उडाला. हिंदुमहासभेचे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा महत्वपूर्ण ठरले. शासनाची सत्ता व किर्ती धुळीला मिळाली." संघाचे गोळवलकर गुरुजी ही यावेळी भागलपूरमधे होते ते सावरकरांना तुरुंगात जाऊन भेटून आले. य ८-१० दिवसंच्या कारावासात सावरकरंची प्रकृती पुहा बिघडली. नंतर शासनाने त्यांची मुक्तता केल्यावर ते त्वरीत मुंबईला परतले.
.
सावरकरांचे अजून एक जनआंदोलन
.
शासनाविरुद्ध सावरकरांनी अजून एक जनआंदोलन करायची तयारी केली होती. ती म्हणजे १९४४ सालच्या पंढरीच्या वारीला ब्रिटीश शासनाने बंदी घातली. सावरकरांनी एक पत्रक काढून ब्रिटीश सरकारला बजावले की ख्रश्चनांना रोम जेवढे पवित्र वाटते तेवढेच पावित्र्य पंढरपूराविषयी मरठयांना आहे. युद्धकाळातही हज ची यात्रा शासनाने चालु ठेवली असता या यात्रेवर बंदी का?यानंतर सावरकरांनी हिंदुसभेसाठी व वराकरी गटप्रमुखांसाठी लढ्याविरुद्ध योजना आखली. त्यात वारकर्यांनी बंदी न मानता पंढरपुराकडे यात्रा सुरु ठेवावी मग ते १० यात्रेकरी असोत की १००००, अटक झाल्यास पांडुरंगाच्या नावे तुरुंगवास भोगावा या तुरुंगवासाचे पुण्य यात्रेसारखेच लाभेल,एकादशीच्या दिवशी पंढरपूर वासियांनी भगवी पताका घेऊन दर्शनाला पोचावे , या बंदिमुळे जी जागृती होईल ती खूप मोठी असेल इ. या पत्रकानंतर ४ दिवसातच ब्रिटीश सरकारने बंदि हुकूम मागे घेतला. सावरकरांनी या निर्णायाचे स्वागत केले पण कार्यकर्त्यांना योजनेत कोणताही बदल करु नये अशी सूचना दिली, कारण अन्य काही निमित्त करुन शासन बंदी हुकूम लागू करेल अशी शक्यता होती. हिंदुसभेच्या मार्गदर्शनाखाली त्या वर्षी पंढरपूर यात्रा जस्त मोठ्या प्रमाणात साजरी झाली.ब्रिटीश शासनाने पुन: बंदिचे नाव घेतले नाही. भागानगर ,भागलपूर नंतर पंढरपूर यात्रेनिमित्त हिंदुसभेने जनाधार मिळवायला सुरुवात केली.त्यावर्षी (सन १९४४) सुमारे १.५ लाखांहून अधिक संख्येने वारकरी यात्रेत सामिल झाले..१९४४ मधेच सुभाषचंद्रांनी गांधीजींना उद्देशुन केलेल्या रेडिओ भाषणात त्यांचा पाठींबा मागितला पण सुभाषचंद्र, गांधीजी व कॉंग्रेसला नकोसे झाले होते. त्याच वेळी हिंदुसभेची सावरकरांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै ला दिल्लीत सभा झाली. सभेपूर्वी सावरकरांनी डॉ.शामाप्र्साद मुखर्जी व हिंदुसभेच्या अन्य बंगाली नेत्यांबरोबर गुप्त योजना आखली,त्याप्रमाणे जेव्हा सुभाषचंद्र बंगालपर्यंत सेनेसह पोचतील तेव्हा बंगाल हिंदुसभेने स्वतंत्र होऊन बोसांना उघडपणे मिळावे. उर्वरीत भारतातील हिंदुसभा सैनिकीकरणाचे धोरण व प्रचार पुढे सुरु ठेवेल.

"In fact Nehru originally condemned the activies of the INA and had written accordingly tp the C in C. But after Bose's death and the Japanese surrender he decided to take up their cause. It was God sent opportunity for him as it could be exploited for political purpose. He decided to make them inti `Heros' and `patriots'. In sept. 1945 , congress asked for the release of the prisoners and set up a Defence commitee to handle their cases. The commitee included Bhulabhai Desai,Asif Ali., and Neharu ,himself. Bhulabhai openly saying that the INA trial had given the Congress the best possible weapon for popoganda. --Disastrous Twilight (1986) by Hamid Major General Shahid p.19

कॉंग्रेस कडे पैसा ताकद सर्वच असाल्याने या हिंदुसभेने INA ला प्रथमपासून पाठींबा दिला त्यांना याचा फायदा १९४५ च्या निवडणूकीत मिळाला नाही. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे कॉंग्रेसला निवडणुकीतील मतांचा खरा जनाधार किती होता? कारण केवळ १० % लोकांनाच मताधिकार होता. म्हणजे ब्रिटीशांनी कॉंग्रेसकडे सत्त सोपवताना 10 % लोकच मतांचे अधिकारी होते. ९० % भारतीय जनता या अधिकारापासूण वंचित होती. त्यात पुन्हा मताधिकार बजावणारे किती असतात? कॉंग्रेस यावेळेला स्वातंत्र्य मिळण्याविषयी पूर्ण अंधारात होती. ब्रिटीशांचा महायुद्धात विजय झाल्याने ते जातील असे त्यांना वाटलेच नाही. अचानक सत्ता चालून येताच घाईघाईने देशहिताचा फारसा विचार न करता कॉंग्रेसने फाळणी स्वीकारुन सत्तेचा ताबा घेतला. महायुद्धापूर्वी ७५ % मुसलमान सैंन्यात होते. सावरकर व हिंदुसभा यांच्या सैनिकीकरणाच्या धोरणानंतर १९४३ ला भारतमंत्यांनी सैंन्यातली जी गणना दिली त्यानुसार मुस्लीम ३४% हिंदु ५० % शीख १० % व ख्रिश्चन व अन्य ६ % असे सैन्यबळ झाले होते. सावरकर नसते तर हि संख्या मुस्लिम ७५ % राहती तर सत्तपिपासू नेहरुंना या मुस्लीम सैंन्याने जागेवर राहु दिले असते का अखंड पाकिस्तान निर्माण केला असता याचे उत्तर कोणाही सूज्ञ माणसाला कळू शकेल.

Friday, August 28, 2009

सक्तीची भाषा समजत नसते

माझ्या परिचयाचे एक गुजराथी गृहस्थ आहेत. माझे मराठीत आणि त्यांचे गुजराथी मिश्रित मराठीत बोलणे चालते.असेच एकदा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, "मुंबईत प्रत्येकाला गुजराथी आलीच पाहीजे."
मी त्यांना विनोदाने म्हणालो," तुमच्या वाक्यात चुका आहेत. मुख्य म्हणजे त्यातील "च" काढून टाका. तो आमचा आहे."

त्यावर ते गृहस्थही हसले.पण त्यांच्य चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते.मी स्पष्टिकरण करीत म्हटले," गुजराथमध्ये गुजराथी आलेच पाहिजे किंवा महाराष्ट्रात मराठी आलेच पाहीजे असे म्हणणे ठीक आहे.पण तोही भाषिक दुराभिमान म्हणून नाही तर साध्या व्यवहाराच्या सोयीच्या दृष्टीने ! अनेक वर्षे एकाच प्रांतात राहिल्यावर प्रांतिक भाषा सहजच येऊ लागते. पण मुंबईतील लोकांचे गुजराथीवाचून काहिही अडणार नाही. त्यांच्यावर सक्ती तर करताच येणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सर्व व्यवहार मराठीतूनच व अपवादात्मक परिस्थितीत हिंदीतून व्हावेत."

ते गृहस्थ म्हणाले," रागावू नका अण तुम्ही गुजराथी भाषेचा द्वेष करता का?"

मी उद्गारलो ," यात द्वेषाचा प्रश्न आलाच कुठे? मुंबईत गुजराथी बरेच आहेत म्हणून गुजराथी भाषेच्या सक्तीची गरज आहे असे म्हणता त्या न्यायाने वडोदऱ्यात मराठीची सक्ती करायची का?"

यावर त्यांच्या कडे उत्तर नव्हते. नंतर आमच्या बोलण्याची गाडी अन्य विषयाकडे वळली. परंतु या गुजराथी माणसाच्या अशा विचाराचे मला आश्चर्य वाटले नाही त्याहून जास्त दुसऱ्या एका मराठी भाषिकाचे बोलणे ऐकून वाटले.

आपण म्हणजे असेच !

हे मराठी गृहस्थही माझ्या बऱ्याच वर्षांच्या परिचयाचे आहेत. बोलता बोलता ते एकदा फटकन उद्‌गारले," आपल्या मराठी लोकांना दुसऱ्यांच्या भाषा शिकायला नको असतात. आता हेच बघाना! मुंबईतील गुजराथी लोकांना मराठी येते पण आपल्याला मात्र गुजराथी येत नाही."

मी त्यांना सबुरीचा सल्ला देत म्हटले, " असा ठाम निष्कर्ष काढु नका.मुंबईत ज्या ज्या लोकांचा गुजराथी लोकांशी संबंध येतो त्यांना उत्तम गुजराथी बोलता येते.दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई गुजरात मधे नसून महाराष्ट्रात आहे आणि गुजराथी लोक येथे आले आहेत.त्यांना मराठी भाषा येणे अगदी साहजिक आहे. आपणासही त्यांची भाषा आली तर वाईट नाही. पण जर आली नाही तर मराठी लोकांना दुसरी भाषा शिकायलाच नको असते असा ठपका ठेवणे अन्यायकारक आहे.
"मला तुमचे म्हणणे पटत नाही " ते अट्टहासपूर्वक म्हणाले.
"थांबा माझे बोलणे पूर्ण झालेले नाही. मी तुम्हाला असे विचारतो की जे मराठी वडोदऱ्यात आहेत त्यांना गुजराथी येतेच ना? ते काही बोलण्याच्या आत मी पुढचा प्रश्न विचारला, "वडोदऱ्यातील कमीत कमी शेकडा नव्वद टक्के मराठी लोकांना गुजराथी येते.पण तेथील किती गुजराथ्यांना मराठी येते?
यावर ते निरुत्तर झाले तेव्हा मीच पुढे म्हणालो, "वडोदऱ्यात ज्या गुजराथी लोकांचा मराठी माणसांशी संबंध येतो त्यांनाच फारतर मराठी येईल. पण इतरांकडून तशी अपेक्षा करता येणार नाही. त्यांच्यावर मराठीची सक्ती करणेही अन्यायाचे होईल. त्याचप्रमाणे मुंबईतही सर्व मराठी बांधवांना गुजराथी आलेच पाहिजे अशी अपेक्षा करता येणार नाही वा तशी सक्तीही करता येणार नाही."

मग मराठी का नको?

गेल्या वर्षी रा.स्व.संघाने कोणत्यातरी सहाय्यक निधीसाठी पत्रक काढले होते. नेहमीप्रमाणे संघाचे एक कार्यकर्ते पत्रक घेऊन आले.सहाय्यक निधी विषयी माहिती देऊन त्यांनी मला पत्रक वाचण्याची विनंती केली. मी पत्रक वाचू लागलो.पत्रक हिंदीमधे होते. ते वाचल्यावर सहज मागील बाजू पाहिली आणि चकीत झालो.पण काही न बोलता त्यांना प्रथम पावती फाडण्यास सांगितली. काम झाल्यावर ते उठून जाऊ लागले. मी त्यांना म्हणालो, "काही वेळ थांबा.तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या हिंदी भाषेतील आवाहनापाठी गुजराथी मधेही आवाहनाचा मजकूर छापला आहे त्याचे कारण काय? गुजराथी बांधवांना हिंदी येत नाही का? "
ते म्हणाले,"तसे नाही पण....."
त्यांना अडवून मी माझा प्रश्न पूर्ण केला," तसे नाही तर मराठीमध्येही का आवाहन केले नाही ?" ( हे पत्रक बहुदा महाराष्ट्राच्या दुष्काळ निधी साठी व मुंबई शहरासाठी काढले होते.)
त्यांनी माझे बोलणे हसण्यावारी नेले व मलाच विचारले," यात काय बिघडले? अशा वादांनी कार्य अडते."

उलट कार्य अडतेच

मी त्यांना अडवले व म्हणालो, "तुम्ही चुकीचे बोलत आहात.तुमचे कार्य मी अडवलेले नाही. पण मला वाईट वाटते ते संघासारख्या स्वत:ला राष्ट्रिय म्हणवणाऱ्या संघटनेने मुंबई शहरात सहाय्य निधी साठी आवाहन केले ते हिंदी आणि गुजराथीतून! मग मग मराठीवर अन्याय होतो असे मराठी लोकांना वाटले तर त्यांचा दोष काय? हे पत्रक तर अगदी जाणूनबुजून काढल्यासारखे वाटते. एकतर केवळ हिंदीतून पत्रक काढायचे किंवा गुजराथीही हवी असेल तर मराठीतूनही काढले गेले पाहिजे होते. येथे तर सरळसरळ मराठीस हद्दपार केलेले दिसते."
"असे घडले आहे खरे" असे म्हणून ते निघून गेले. खरे तर अशा घोडचुकांनीच इतर प्रांतात कार्य अडले असते. पण मीही त्यंच्यासारखाच मराठी ! त्यामुळे "कार्य" अडले नाही इतकेच.

अनेक भाषा येणे हा सद्‌गुणच आहे. ती गोष्ट अभिमानास्पदही आहे.आज अनेक भारतीय परप्रांतीय भाषा आवडीने शिकतात. जर्मन, रशियन, फ्रेंच इ. भाषाही शिकतात. रशियन लोक मराठी शिकू लागले आहेत तर जर्मनीत संस्कृतचा अभ्यास होतो. पण त्यात सक्ती नसते. हटवादी पणा आला की सर्व बिघडते. महाराष्ट्रात राहून मराठीचा द्वेष, बंगालात राहून बंगाली चा द्वेष आणि भारतात राहून हिंदीचा द्वेष या गोष्टी भाषिक दुराभिमान दर्शवतात.

या वरील तिनही उदाहरणामध्ये मी भाषिक दुराभिमान दाखवत नव्हतो. या तिन्ही प्रकारात आलेल्या हट्टी भाषेमुळे निर्माण होणारा भाषिकवाद दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

प्रथम प्रकाशन:

साप्ताहिक मार्मिक
१२ जुलै १९८७

Thursday, August 27, 2009

हव्यास !

देसाई ऍंड कं.च्या ऑफिस मध्ये बसून काम करता करता सबनीसांचे विचारचक्र चालू होते.आपण असे का केले? सबनीसांचे विचार घाण्याच्या बैलाप्रमाणे पुन: पुन: याच प्रश्नाशी येऊन थांबत होते.या प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्य आहे हे सुद्धा सबनीसांना समजून चुकले होते.नेहमीच्या सवयीने ते काम करीत होते एवढेच! कामात चुका झाल्या तरीही त्यांच्या दॄष्टीने काहीच फरक पडत नव्हता.मेलेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात ना तसे.

सबनीसांची मन:स्थिती आज सकाळपासूनच ठीक नव्हती.आधीच मुंबईतील गिरगावच्या चाळीतील वातावरण.त्यात सकाळी सकाळीच त्यांच्या बायकोचे,कुंदाचे व त्यांचे कशावरून तरी बिनसले आणि तिचा भोंगा सुरू झाला. नेहमीप्रमाणेच सबनीस ओठ आवळून गप्प झाले.पण कुंदा शेवटी त्यांच्या काकांचा उद्धार करू लागली आणि सबनीस वैतागले.काका म्हणजे त्यांच्या कंपनीचे मालक देसाई! ते त्यांचे सख्खे काका नव्हते.त्यांचे व सबनीसांचे नाते तसे दूरचेच. देसाई सबनीसांच्या वडीलांचे मावसभाऊ! तसे पाहता देसाईंचे त्यांच्यावर फार उपकार होते.नुसते उपकारच नाहीत तर सबनीसांचे सारे आयुष्यच त्यांनी उभारून दिले होते.

सबनीस आयुष्यात तसे दुर्दैवीच होते.आई-वडील लहानपणीच गेलेले.भाऊ-बहीण कोणीच नव्हते.जे थोडेफार नातेवाईक होते त्यांना सबनीसांची जबाबदारी नको होती.पण त्याचवेळी कसे कोण जाणे पण देसाईंना पत्ता लागला आणि त्यांनी या पोरक्या पोराला आपल्या घरी आणले.सबनीसांना त्यांनी सख्ख्या मुलासारखे वागवले.शिक्षण दिले, त्यांचे लग्न करून दिले आणि नंतर खटपट करून पैसा खर्चून गिरगावातल्या चाळीत का होईना पण जागा घेऊन दिली.या काळात कोण कोणाचे एवढे करतो?पण देसाईंचे मनच उदार आणि उमदे! त्यात त्यांना आर्थिक दॄष्ट्याही काही कमी नव्हते. केमिकल्स सप्लायरचा त्यांचा मोठा धंदा होता. मुख्य ऑफिस मुंबईला आणि त्यांच्या शाखा महाराष्ट्रात चारपाच मुख्य शहरातून होत्या. देसाई ऍंड कं.ला बाजारात पत होती. सबनीसांनी या सर्वांचे चीज केले. धोपट मार्गाने जाऊन बी.एस.सी.झाले आणि काकांना त्यांच्या धंद्यात मदत करू लागले. सबनीसांचा वंश सावरल्याचे समाधान देसाईंना मिळाले.

पण हा सर्व इतिहास माहीत असूनही कुंदा काकांचा द्वेषच करीत असे.तिचा स्वभावही हातात दोन रूपये असले तर त्यावर वीस रूपये उधारी करणाऱ्यातील होता.सुरूवातीला ती सबनीसांना म्हणालीही होती ,"तुमचा पगार आपल्याला दोन दिवसही पुरणार नाही.माझ्या माहेरी आमचा रोजचा खर्चच तुमच्या महिन्याच्या पगारएवढा असे."

सबनीस त्यावर म्हणाले ,"माझे आतापर्यंत सर्व काही काकांनी केले आहे. आताही ते मला पुरेसा पैसा देत आहेत.मी काही त्यांच्याकडे अधिक मागणार नाही."

"पण मला एवढ्यात संसार करणे जमणार नाही."कुंदा म्हणाली होती.
"तुझ्या माहेरीही आता पूर्वीसारखी स्थिती नाहीच.पूर्वी तुमची श्रीमंती ऊतु जात असली तरी गेली सहा वर्षे तुझ्या माहेरची स्थिती...."

"तुम्ही मला हिणवता आहात?"एकदम उसळून कुंदा म्हणाली,"आता अशी स्थिती असली तरी आमचे घराणे पूर्वी पिढीजात श्रीमंत होते."

"पण आता नाही ना?तुला त्या स्थितीचीही सवय झालीच होती तर आताच तुझा एवढा अट्टाहास का?"

"म्हणूनच मला सासर श्रीमंत हवे होते."

"पण जे नाही त्याचा हव्यास का? "सबनीस तिची समजूत घालत म्हणाले,"सत्य परिस्थिती तुला मान्य केलीच पाहीजे.तुझ्या उधळेपणाला थोडा आळा घाल."

"काय बाई माझं नशीब कुठे माझे......" रागाच्या भरात कुंदा बोलून गेली होती,

या क्षणीही सबनीसांचा चेहरा शरमेने काळाठीक्कर पडला.(त्यामुळे त्यांचा मूळचा रंग अधिक गडद झाला.) पण कुंदा म्हणाली ते खरेच होते.सबनीसांचे मित्रमंडळ उघडपणे सबनीस दांपत्याला अमावस्या पौर्णिमेचा मिलाफ म्हणत असे.
नशिबाने खुडल्या गेलेल्या कुंदाच्या आशाआकांक्षेचे भूत होऊन तेच त्यांच्या घराला ग्रासून टाकत होते.दहा-बारा वर्षे तिने कशीतरी काढली.त्या अवधित तिलाही देसाईंच्या उदारपणाचा पुरेपूर प्रत्यय आला. सबनीसांच्या कोणत्याही घरगुती वा आर्थिक अडचणीमध्ये देसाई त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असत.पण कुंदाची हाव फारच मोठी होती. तिची नजर देसाई ऍंड कं.च्या पार्टनर्शिप कडे होती.सतत आपली तुलना देसाई कुटुंबाशी करीत राहिल्या मुळे तिला त्यांचे उपकारकर्ते असूनही देसायांचाच मत्सर वाटू लागला.त्याचवेळी त्यांचा एकुलताएक मुलगा बारावी पास झाला.त्या उत्साहात आपल्या स्वभावाप्रमाणे मोठ समारंभ करून तिने दिड-दोन हजाराचा खुर्दा केला.पण तिच्या महत्वाकांक्षेप्रमाणे त्याला त्याच्या गुणांच्या आधारावर मेडीकल ला प्रवेश मिळाला नाही आणि सबनीस त्याच्या गुणांची कमतरता पैशाची बेरीज करून भरू शकले नाहीत.तेव्हा कुंदा ‘माझ्या मुलाच्या आयुष्याची तुम्ही नासाडी केलीत’ असे सबनीसांना म्हणू लागली.तिची मते त्या मुलाच्याही डोक्यात शिरली.आपली कमतरता झाकायला त्याला ती बरी वाटली आणि तोही बापावर राग काढीत हिंडु लागला.सबनीसांचे मत वेगळे होते.त्यांच्या मते आपल्या मुलाने बी.एस्‌.सी. ,पुढे एम्‌.एस्‌.सी.व्हायला हरकत नव्हती.पुढे आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना आपल्या मुलाच्या मदतीने काकांसारखाच स्वतंत्र व्यवसाय सुरू करता आला असता आणि त्यासाठी काकांनीही मदत केली असती.आता उगाच पात्रता नसताना त्याला मेडीकलला प्रवेश घ्यायला लावायचा आणि तेही तेवढा पैसा नसताना-हे व्यवहार्य वाटत नव्हते.पण कुंदाला ते पटले नाही.तिला पटवून घ्यायचे नव्हतेच आणि एक दिवस या साऱ्याचा स्फोट झाला होता.

ती तावाताचाने म्हणाली,"मला आता हा दरिद्रीपणा सहन होणार नाही.मी हप्त्याने बऱ्याच वस्तूंची ऑर्डर दिली आहे.पहिल्या प्रथम तीन हजार रूपये भरायचे आहेत."

"अग पण मला न विचारता....."

"तुम्हाला काय विचारायचे?आता कॄपा करून घरात येणाऱ्या वस्तु परत पाठवायला लावू नका."

यावर सबनीस काहीच बोलले नाहीत.पण तिचे डोळे पाहून आता आपणास काहीतरी करणे भागच आहे हे त्यांना पटले आणि त्या दिवशी मेल्या मनाने ऑफिसचे व्यवहार करताना देसाईंनी त्यांना हाक मारली होती.तो दिवस सबनीसांना आजही आठवत होता.देसाईंनी हाक मारताच सबनीस त्यांच्या जवळ गेले.आपल्या बाजूला उभ्या असलेल्या एका रूबाबदार माणसाची देसाईंनी सबनीसांशी ऒळख करून दिली होती.

"हा माझा पुतण्या रमाकांत-रमाकांत सबनीस ! याच्यावर विसंबून मी कधीही कोठेही दौऱ्यावर जाऊ शकतो."देसाई त्यांची प्रशंसा करत म्हणाले,"आणि रमाकांत हे मि.अहलुवालिया! आपल्याला रॉ मटेरिअल सप्लाय करणाऱ्या एस्‌.के.एल्‌.चे नवे मॅनेजर!"

"ग्लॅड टु मीट यु मि.सबनीस."

"आय ऍम टू मि.अहलुवालिया."

"रमाकांत तू यांच्या बरोबर जा.ऑर्डरच देऊन ये.आणि हो,आपल्या नागपूर शाखेकडे वीस हजारांचा ड्राफ्ट पाठवायचा आहे ते काम परतल्यावर न विसरता कर."

सबनीस अह्लुवालियांबरोबर निघाले.जाताना अहलुवालिया आपल्या मटेरिअलची माहीती देत होते.बोलता बोलता मंद हसत ते म्हणाले," मि.सबनीस,आमच्याकडे दोन प्रकारचा माल विकला जातो."

"दोन प्रकारचा?" सबनीसांना उलगडा झाला नाही.

"मि.सबनीस ,हे अगदी उघड गुपित आहे.एक माल चंगल्या दर्जाचा असतो.दुसरा कमिशन देऊन विकतो.म्हणजे आमचाही फायदा आणि...ऑर्डर देणाऱ्याचाही फायदा!" क्षणभर थांबून मंद हसत अहलुवालिया म्हणाले, ,"प्लीज,गैरसमज करुन घेऊ नका सबनीससाहेब! बोलण्याच्या ओघात आले म्हणून सांगीतले. तुमच्या बाबतीत ही गोष्ट शक्य नाही. नाही का?"

सबनीसांच्या चेहेऱ्यावर चलबिचल दिसू लागली. मग थोडया वेळाने ते संथ स्वरात म्हणाले," मि.अहलुवालिया ,माझ्याविषयीही ते सहज शक्य आहे.मीही माणूसच आहे."

"इट्‌स एक्स्पेक्टेड सबनीससाहेब. तुम्ही मराठी मेंटॅलिटीचे नाही हे मी तुमच्या चेहेऱ्यावरुनच ओळखले. बाय द वे! तुमचा निर्णय चांगला आहे.आपण एकमेकांना सहकार्य करु."

आताही त्या आठवणीने सबनीस कासावीस झाले. तो दिवस उगवलाच नसता तर बरे झाले असते. पण त्यावेळी तरी आपण करतो आहोत ते योग्य की अयोग्य याचा निर्णय करायच्या पलिकडे गेलो होतो, हे त्यांना मनाशी मान्य करावेच लागले. नाही म्हणायला पहिल्यांदा कुंदाला पैसे देताना त्यांना थोडे धडधडत होते पण तिने हे पैसे कोठून आले याची एका शब्दानेही चौकशी केली नाही. नंतरही कधी या पैशाचा उगम शोधायचा प्रयत्न केला नाही. दिवस जात राहीले. पैसा येत असूनही तो पुरत नव्हता. पैसा साठवून ठेवायची कुवत कुंदात नव्हती. तिच्या उधळपट्टीविषयी शेजारी पाजारी, नातेवाईक चर्चा करीत. सबनीसांनी आपल्या एका जिवलग मित्राला बोलताबोलता कुंदाचा हा स्वभाव सांगीतला. तेव्हा त्याने उत्तर दिले की, कुंदावहिनी अपुऱ्या राहीलेल्या आपल्या महत्वाकांक्षा पुऱ्या करायचा हा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. स्वत:चा मोठेपणा मिरवण्यासाठी स्वत:चे गुण दाखवून मोठेपणा मिळवण्यापेक्षा पैशाने मोठेपणा गाजवण्याची त्यांची वृत्ती आहे.सबनीसांना ते मनोमन पटले होते. देसाईंनीही सबनीसांना एकदा याविषयी सुचनले होते. पण सबनीस आपल्या बायकोच्यापुढे काहीच बोलू शकणार नव्हते हे त्यांनाही माहीत होते. कुंदाच्या या वागण्याचा मुलावरही वाईट परिणाम होत होता. या साऱ्यांचा शेवट काय हे सबनीसांना कळेनासे झाले होते. पण आपल्या कृत्याचे परिणाम काय होणार आहेत ते त्यांना स्पष्टपणे माहित होते.
आणि परवाच देसाईंनी सबनीसांना बोलून दाखवले,

"रमाकांत, यावर्षी आपल्याला प्रॉफिट कमी झालेला दिसून येतो आहे.पण त्याचे कारण मात्र कळत नाही." देसाई म्हणत होते, "मात्र मी ते शोधून काढल्याशिवाय राहणार नाही."

"पण कारण तर काही दिसत नाही." सबनीस गुळमुळीतपणाने म्हणाले.

"नाही खरे! पण आपल्या मालाच्या क्वालिटीविषयी तक्रारी आहेत आणि हिशोबातही बरीच तफावत आहे. तू आणि जगदिश नेहमी हे काम पहाता, तेव्हा तुला याविषयी काय वाटते?"

"सर्व अकाउंट्‌स पुन: बारकाईने पाहीले पाहिजेत."

"ठीक आहे. तू ये परवा रात्री, आपण ते काम करून टाकू."

आणि तो आजचा दिवस होता. त्यामुळे सबनीसांची मन:स्थिती चांगली असणे शक्यच नव्हते. ते उदासपणे स्वत:शीच हसले. काकांकडे जातांना हे आपण सारे का केले याचा शोध घेण्याचा पुन: निष्फळ प्रयत्न करु लागले. विचारांच्या नादात आपण केव्हा काकांसमोर येऊन उभे राहिलो ते त्यांना कळले नाही. पण तेथे फक्त काका नव्हते. देसाई ऍंड कंपनीचे पार्टनर्स तेथे उपस्थित होते.

"बैस रमाकांत!" देसाई थकल्या सुरात म्हणाले. इतर सर्वजण दुखावलेल्या नजरांनी सबनीसांकडे पहात होते.

"तू असे का केलेस, रमाकांत?" देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.

"मी कुठे काय? काही नाही."

"बस्‌! आम्हाला सारे काही कळले आहे. तुझे खोटे हिशोब, कमिशन खाणे सारे सारे. अरे, ज्या घरात तुला....." देसाई कडाडले. पण त्यांनी वाक्य अर्धवटच सोडून दिले. सबनीस कोणाच्याही नजरेला नजर न देता खालि पहात राहिले.

"अरे, तुला काय कमी पडले होते. पैसा मिळवायचे इतर मार्ग नव्हते का? आपले बोलणे सुद्धा व्हायचे. मी तुला स्पष्ट सांगीतले की, तुला स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तरी सांग. मी तुला अडवणार नाही.मदतच करीन. असे असूनहि ही काय दुर्बुद्धी सुचली?"

सबनीसांच्या तोंशून शब्दच फुटत नव्हता. नुसतेच भ्रमिष्टाप्रमाणे ‘चुकले....चुकले...’ म्हणत राहिले.

"तुला माहीत आहे?, देसाई पुढे म्हणाले, " आपल्या साऱ्या व्यवसायात ही गोष्ट पसरली आहे. साऱ्या घरात पसरली आहे. प्रत्येकजण ऎकल्यावर धक्का बसून पहात रहातो,मग म्हणतो, काय रमाकांतने असे केले. छे छे, अगदी अशक्य! - साऱ्यांचा विश्वास मातीमोल केलास तू."

"आम्ही अर्थातच शक्यतोवर ही पोलीस केस करणार नाही." देसाई ऍंड कंपनीचे एक उद्‌गारले, "पण तू पुढे काय करायचे ठरवले आहेस?"

सबनीस अस्पष्ट स्वरात म्हणाले, "मी एक पोरका पोर म्हणून मुंबईत आलो, आता एक कृतघ्न चोर म्हणून मुंबई सोडून परागंदा होणार!"

यापुढे सबनीस काहीच बोलू शकले नाहीत. त्यांचे डोळे भरुन आले. त्यात त्यांना उध्वस्त झालेले आपले घरकुल दिसत होते आणि सबनीसांचा वंश सावरण्यात आपण अपयशी ठरल्याची काकांच्या चेहऱ्यावरची खंत तेवढी दिसत होती. हे दृश्यही अस्पष्ट होत नाहीसे झाले.

प्रथम प्रकाशन:

"साप्ताहिक विवेक दिवाळी १९८७"
प्रथम क्रमांक कथा

महान द्रष्टे सावरकर : काल,आज आणि उद्या

देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजकारणी,नेते, देशभक्त होत असतात परंतु त्यांच्यामध्ये राष्ट्रहिताचा, केवळ वर्तमानाच्याच नव्हे तर भविष्याच्या दृष्टीनेही विचार करणारे फारच थोडे असतात. अशा द्रष्ट्या नेत्यांमध्ये स्वा.सावरकर अग्रगण्य होते.

स्वा.सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास सखोल होता.इतिहास म्हणजे गत पिढ्यांचे सामुहीक अनुभव! त्यांचा साठा ज्या समाजापाशी असतो त्यांनी पुन्हा ‘पहिले पाढे पढ पंचानन्न’ करणे म्हणजे अक्षम्य चूक ठरते.

१९१० चे सावरकरांचे अटकेनंतरचे छायाचित्र


अहिंसा, ह्रदयपरिवर्तन इ. उपायांनी युद्धे जिंकता येत नाहित आणि भारताच्या स्वातंत्र्याला सशस्त्र क्रांतीवाचून पर्याय नाही असा इतिहासाभ्यासक सावरकरांचा ठाम विश्वास होता.त्यांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ व ‘मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना’ म्हणजे क्रांतीकारकांच्या तीन पिढ्यांची गीता झाली होती. आझाद हिंद सेनेच्या पुढे सुभाषबाबूंनी केलेल्या भाषणांमधील उतारेच्या उतारे १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथामधील असत. मॅझिनीच्या चरित्राच्या प्रस्तावनेत सावरकर लिहीतात, ‘मोठमोठ्या क्रांत्या या तत्वांनीच घडवून आणलेल्या असतात पण तलवारीवाचून तत्वांचा विजय होत नाही व म्हणूनच इटलीने तलवार उपसली.’

इंग्रजांना अहिंसक चळवळींपेक्षा सशस्त्र क्रांतीकारकांचीच अधिक भीती वाटत असे.तत्कालिन पंतप्रधान ऍटली यांचे वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या धोरणाला मिळालेली पोच आहे. ऍटली म्हणतात,‘ महायुद्धानंतर ब्रिटीश सैंन्य हिंदुस्थानावर जास्त पाठवणे शक्य होणार नाही व देशी सैंन्यावरील आमची पकड सुटली आहे.’

यावरुन स्पष्ट आहे की सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणामुळे व आझाद सेनेच्या सशस्त्र क्रांतीमुळे इंग्रजांची भारतावरील पकड सुटली व त्यांना स्वातंत्र्य देणे भाग पडले. सावरकरांनी १९३७ सालापासून राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदुंचे सैनिकीकरण हे धोरण स्वीकारुन आणि लेखण्या मोडा व बंदुका घ्या असा संदेश देऊन सैंन्यातील हिंदुंची संख्या तीसावरुन साठ टक्क्यांवर नेण्यात यश मिळवले. परंतु अनेकांना त्यांचे हे धोरण समजलेच नाही काहींना समजूनही त्यांनी तेथे दुर्लक्ष केले व सावरकरांना रिक्रुटवीर म्हणून हिणवण्यात धन्यता मानली.परंतु इंग्रजांना मात्र सावरकर आपल्या महायुद्धात झालेल्या अडचणींचा लाभ उठवत असल्याची पूर्ण जाणीव होती. पण त्यांना निरुपायाने सावरकरांचे सहकार्य घ्यावेच लागले.

सुभाष बाबू सावरकर भेट














सावरकरांच्या धोरणाचा परिणाम म्हणूनच सैंन्यातील हिंदुंची संख्य़ा साठ टक्क्यांवर गेली. तसे न होते तर स्वातंत्र्य मिळवण्यास विलंब झाला असताच पण त्यावाचून हिंदुस्थानचे अधिक तुकडे पडले असते. स्वत: सुभाषचंद्र बोस यांनीच रंगुन आकाशवाणीवरुन जाहीर आभार मानले व मान्य केले की त्यांच्यामुळेच आझाद हिंद सेनेला स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्दीष्टासाठी अधिकाधीक देशभक्त सैनिक मिळू शकले.


यातून सावरकरांचा द्रष्टेपणा सिद्ध होतो. पण असे असूनही आजही आपण रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळवल्याचा घोष करतो. अनेक स्वकीयांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करतो. सावरकरांची भूमिका मात्र सर्वांना यथायोग्य श्रेय देणारी होती. त्यांनी सशस्त्र क्रांती व अहिंसक चळवळ यांना यथायोग्य श्रेय देऊन म्हटले, मला सत्तेची हाव नाही. मातृभूमि तीन-चतुर्थांश का होईना याची देही याची डोळा स्वतंत्र झाली यातच आम्ही कृतार्थ झालो.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ते जीवापाड जपणेही महत्वाचे हे ओळखून ते तरुणांना सतत सैन्यात शिरा, सबल व्हा. दुर्बल राष्ट्रांना जगात न्याय मिळू शकत नाही असे सांगत. परंतु स्वतंत्र भारताचे धोरण अहिंसा, ह्रुदय परिवर्तन, विश्वशांती, अलिप्तता चळवळ यांच्या जंजाळातच अडकले होते. या धोरणांना सावरकरांचा विरोध नव्हता, पण आधी बलवंत व्हा मगच तुमच्या धोरणांना मान मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळूनही आपण सीमाविभागाकडे दुर्लक्ष केले, तर याउलट पन्नास वर्षांच्या काळ्यापाण्याची भयाण शिक्षा समोर उभी असूनही, अंदमानला पोचताच सावरकरांच्य्या दृष्टीपुढे उभे ठकले ते अंदमानचे सामरीक महत्व! धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरते हे जाणून त्या विवशतेतही त्यांनी शुद्धी कार्य चालु ठेवले. तेथील हिंदुंमधे तेथेच स्थायिक होण्याचा प्रचार केलाव अंदमानात हिंदुंची बहुसंख्या कायम केली, व भारताला एक प्रबळ नाविक केंद्र मिळवून दिले. असे असूनही आपण मात्र सैनिकीकरणाकडे, लष्करी सामर्थ्याकडे पोकळ तत्वज्ञानाने दुर्लक्ष केले. परिणामी भारतावर केवळ अठरा वर्षांत तीन आक्रमणे झाली, १९६२ च्या युद्धात तर भारताची जगात नाचक्की झाली, विश्वशांतीचा बोजवारा उडाला आणि अलिप्तता हास्यास्पद ठरली. दोन लढाया जिंकूनही ह्र्दय्परिवर्तनावर विश्वास ठेऊन तह मात्र हरलो.

असे असले तरी अलिकडे मात्र सावरकरवादाचा स्वीकार करावा लागत आहे,केला जाणे भाग पडत आहे. १९७१ मध्ये आक्रमक धोरण स्वीकारुन भारताने पाकिस्तानावर मोठा विजय मिळवला. तीनही सेनादले आज आपण खूपच सुसज्ज केली आहेत, अण्वस्त्रे तयार करण्यातहि आपले धोरण नकाराय्मक नाही. हा सावरकरवादाचा, सावरकरांच्या द्रष्टेपणाचा विजय आहे. स्वतंत्र भारताचे सैंन्य नि:शस्त्र होऊन शत्रुसैंन्यापुढे सत्याग्रह करेल या टोकाचा गांधीवाद आज कोणी विचारात सुद्धा घेणार नाही. यापुढेही शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा स्वीकार करून इस्रायल, अरब राष्ट्रे व पी. एल्‌.ओ सारख्या दहशतवादी संघटना यांच्या संबंधातील धोरण आपणास बदलावे लागेल यात शंका नाही. अंतर्गत एकात्मतेच्या विषयी मात्र आपण अजूनही सावरकरांचा द्रष्टेपणा मान्य करुन सावरकरवाद स्वीकारलेला दिसत नाही. तसे नसते तर पंजाब प्रश्न एवढा चिघळला नसता आसामी हिंदुंना चाळीस वर्षांपूर्वीच सावरकरांनी दिलेले इशारे व संदेश त्यांनी मानले असते तर आसाम समस्या रक्तपाताविना सुटली असती. त्यावेळेस बांगला देश नसला तरी मुस्लीम घुसखोरांच्या वृत्ती आताच्या घुसखोरांप्रमाणे होत्या. १९८२ साली निर्माण झालेल्या स्फोटक आसामचे भविष्य सावरकरांनी १९४१ मध्येच वर्तवले होते. पण तरिही परकीय मुस्लीमांना आश्रय देऊन आपण आपल्या पदरात निखारे बांधून घेत आहोत याचे कोणासही भान नव्हते.

नागा बंडखोरांविषयी कडक धोरण आखण्याची मागणी सावरकर सतत करत होते पण भारताची भूमिका बोटचेती होती. जशी अलिकडे पंजाबसंबंधी होती. १९६० मध्ये दिलेल्या भाषणात सावरकर म्हणतात, ‘नागभूमिविषयी नेहरुंनी पहिली आज्ञा दिली ‘सैनिकहो गोळी खा पण उलट गोळी मारु नका! ते आपले लोक ना? ’या आदेशामुळे नागा बंडखोर प्रबळ होत गेले. रोज आपले सैनिक मरु लागले. आमची मान लाजेने खाली जाऊ लागली. विमाने पाठवून चार दिवसात बंडखोरांचा निकाल लावत आला असता. पण नेहरुंचा विश्वास ह्रुदयपरिवर्तनावर!’

पंजाबमध्येही असेच घडत होते; शेवटी मात्र सावरकरवाद स्वीकारुन सैंन्याच्या सहाय्याने सुवर्णमंदीर देशद्रोह्यांपासून मुक्त केले गेले.

सावरकरांचे द्रष्टेपण भल्याभल्यांना कळू शकले नाही. सावरकरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हिंदु संघटनेच्या चालकाचाही अगदी १९४६ च्या अंतापर्यंत गांधीजींवर विश्वास होता. गांधीजी व कॉंग्रेस देशाची फाळणी स्वीकारण्याच्या दिडेने प्रवास करत आहे या १९२७ पासून सावकरांनी सांगीतलेल्या भविष्याची सर्वांनी टवाळी केली. मुस्लीमांच्या अरेरावी मागण्या, मोपल्यांचे भीषण अत्याचार, मुस्लीम नेत्यांच्या देशात अराजक माजवण्याच्या प्रकट प्रतिज्ञा, सर्व देशभर होणाऱ्या हिंदुंच्या कत्तली तर याउलट सावरकरांचे हिंदुसंघटन, हिंदुंना सशस्त्र अ सावध होण्याचे इशारे,शुद्धीकार्य, धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरणार असा गंभीर इशारा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुंनी आत्मघात करुन घेतला.सावरकरांचे भविष्य कोणाला पटतच नव्हते.ज्यांनी सावरकरांना जातीयवादी ठरवून वाळीत टाकले त्यांनीच जीनांच्या घराचे उंबरठे झिजवण्यात मात्र कमीपणा मानला नाही. १९४० च्या नवयुगच्या एका अंकात आचार्य अत्रे लिहीतात," मुस्लीम लीगशी, लीगच्या अटींवर समेट करण्यास, कॉंग्रेस कधीही राजी नसता, कॉंग्रेस लीग करार हिंदुंवर बंधनकारक नाही असे,सावरकर कॉंग्रेसला दर महिन्यातून बजावत असतात. पुन्हा पुन्हा तेच तेच दळण ते दळीत असून वाचकांच्या तोंडाला अगदी चिकटा आला आहे." याच अत्र्यांनी कॉंग्रेसने फाळणी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस सोडली.(त्यांनी निदान झालेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा तरी दाखवला इतरांना तेही जमले नाही.)

सावरकरांवर अविश्वास दाखवणाऱ्यांनी गांधीजींच्या १९४० मधील पत्रकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्या पत्रकात गांधीजी म्हणतात,"मुसलमानांना स्वयंनिर्णयाचा हक्क आहे व तो बजावण्याचे त्यांनी ठरवले तर त्यांना कोण रोखू शकेल?"

अनेक शतकांचा इतिहास दृष्टीपुढे असूनही सावरकर सोडून इतर सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुस्लीम-अनुनयाचे धोरण स्वीकारले.सावरकरांनी दुरदर्शीपणे हिंदुंचे मोठया प्रमाणात सैनिकीकरण घडवले नसते तर हिंदुंची स्थिती काय झाली असती याची कल्पनाच करवत नाही.हे सर्व स्वातंत्र्यापूर्वी घडूनही स्वातंत्र्यानंतरही सावरकरवाद दुर्लक्षितच राहिला. फाळणीचा अनुभव लक्षात घेऊन हिंदु-मुस्लीमांची अदलाबदल केली असती तरी अर्धी लढाई आपण जिंकली असती. पण ते न होता पाकीस्तानच्या उदकावर पंचावन्न कोटींची दक्षिणा दिली गेली व त्यातून काश्मिरचा अर्धा भाग भारतापासून ओरबाडला गेला. हिंदुराष्ट्रवादाचा धिक्कार केला गेलाच पण निधर्मी राष्ट्रात अत्यावश्यक असलेली समान नागरी संहिताही स्वीकारली गेली नाही. स्वातंत्र्यानंतरही सहस्त्रावधी निरपराध्यांचे बळी जात राहिले. द्रष्टया देशभक्ताची उपेक्षा केल्याने दुसरे काय होणार?

स्वराज्यासाठी लढताना सुराज्याचे भानही द्रष्टया सावरकरांना होते. रोटीबंदी,स्पर्शबंदी यासारख्या सात बेडयांनी हिंदुस्थानचा ऱ्हास झाला असे ते म्हणत. या सप्तबेडया त्यांनी स्वत: तोडल्या होत्या. व्यवसायबंदी तोडण्यास स्वत: विविध व्यवसाय करुन लोकांनाही त्यांनी त्यासाठी उत्तेजन दिले, सहभोजनांचा धुमधडाका उडवून दिला.अस्पृश्यता गाडण्यासाठी त्यांनी जे अविश्रांत प्रयत्न केले त्याचे पतितपावन मंदिर हे स्मारक होय. मात्र त्यांच्या सुधारणा एकांगी नव्हत्या. स्त्रीसंघटन,स्त्री-शिक्षण,स्त्री-पुरुष समानता त्यांना मान्य होते पण स्त्रियांचे पुरुषीकरण अमान्य होते.

पतितपावन मंदीर











अस्पृश्यतेचा दोष सर्वांचा आहे,कोणा एका जातीच्या माथ्यावर त्याचे खापर फोडून इतरांची या पापातून सुटका होणार नाही. अस्पृश्य समाजातही उच्चनीचता व सप्तबेडया आहेत. या रोगाने सर्वांनाच ग्रासले आहे व सर्वांनी मिळूनच या रोगाचा निःपात करायचा आहे असा पुरस्कार त्यांच्या लेखनातून आढळतो. याच दृष्टीकोनातून त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतराला व त्यांनी मनुस्मृती जाळण्याच्या घटनेला प्रखर विरोध केला. अन्य धर्मांतही हे दोष आहेतच तेव्हा धर्मांतराने प्रश्न सुटणार नाहीच पण आणखी बिकट होईल असे त्यांनी आंबेडकरांना बजावले. कोणतेही धर्मग्रंथ जाळण्यास त्यांचा विरोध होता. धर्मग्रंथामधील जेवढे कालानुरुप असेल तेवढेच घ्यावे,असे ते म्हणत. काळाची पावले ओळखूनच ते वागत म्हणून तर सावरकर द्रष्टेपदाला जाऊन पोहोचले. सप्तबेडया तोडण्यासाठी रत्नागिरीमधे त्यांनी जे उपाय करून सुधारणा केल्या ते फार महत्वाचे आहे. धर्मांतराने प्रश्न न सुटता बिकट होतील हे त्यांचे म्हणणे खरे ठरलेच आहे. हे प्रश्न सोडनण्यासाठी विज्ञानबळाचे सहाय्य होईल हे त्यांनी ओळखले, व २१ व्या शतकातील विज्ञाननिष्ठा त्यांनी २० व्या शतकाच्या पूर्वार्धातच दाखवली.देशाची प्रगती व्हावी म्हणून भाबडया समजूतींवर प्रहार करुन समाजाचा रोष ओढवून घेतला पण आपली मते सोडली नाहीत, यंत्रयुगाला अव्हेरले नाहीत."जर का आज पेशवाई असती" या लेखातून त्यांनी विज्ञानाने बलवान झालेल्या भारताचे स्वप्न रंगवले आहे.
"भारत पुन्हा जागृत झाला आहे,वैज्ञानिक प्रगतीने सर्व जगात एक महासत्ता बनला आहे.हिंदु फौजा लंडन,फ्रान्स,अमेरीका गाठत आहे.क्रीडा व कला क्षेत्रांमधे भारतीय उच्चांक करत आहेत" अशा भारताचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते. "कोटी कोटी हिंदु जाती चालली रणाला,होऊनिया मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता" हे त्यांचे,त्या महान द्रष्टयाचे भविष्य होते. ते प्रत्यक्षात आणण्याचे उत्तरदायित्व आता स्वतंत्र भारतावर आहे.


पारीतोषीक विजेता लेख

प्रथम प्रकाशन:
मासिक वीरवाणी
२६ फेब्रुवारी १९८७

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...