Wednesday, December 28, 2016

सावरकरांनी काय केले? गोव्याच्या कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे, त्यास अल्प शब्द मर्यादेत उत्तर देणारे माझे संकलन दि. २८-१२-२०१६ ला दैनिक गोमन्तक मध्ये मुद्रित झाले.

Image may contain: 1 person



Saturday, December 24, 2016

अस्मितेच "भांडवल" मराठी माणसाला व्यावसायिक बनवंयास अपुरे !

***** अस्मितेच "भांडवल" व्यापारी व व्यावसायिक होण्यासाठी पुरत नाही ****
१९४७ ते १९७१ पर्यंत हिंदुमहासभा शिल्लक होती व क्रमाक्रमाने कमकुवत होत गेली. या काळात सावरकर जवळपास निवृत्त झाले होते. आपण हिंदुहिताचे राजकारण करतो ,आपल्या नावात हिंदु शब्द आहे तरी हिंदुमहासभेला यश का मिळत नाही, हिंदु माणस आपल्याला मते का देत नाहीत याची उमज हिंदुमहाभेला पडत नव्हती. आपल्याला संपवत आहेत म्हणून वैचारीक दृ्ट्या सर्वात जवळ आलेल्या संघ परिवार, जनसंघ, गोळवलकर गुरुजी यांच्या नावे बोटे मोडणे, तळतळाट करणे या शिवाय अन्य उद्योग हिंदुमहासभेला राहिले नाहीत. मूळ वैचारीक शत्रू बाजूलाच राहिले.आज हिंदुमहासभा या पक्षातला आधीचा "अखिल भारतीय" हा शब्द अक्षरश: केविलवाणा वाटतो. हा पक्ष अधुनमधुन दिसतो ते मूठभर कार्यकर्ते आणि अन्य कोणाही पक्षाकडे नाही एवढ्या मोठया "अ.भा.हिंदुमहासभा भवन" या दिल्लीतल्या वास्तुच्या आधारावर.
महाराष्ट्रात दोन पक्ष मराठी माणसाच नाव घेतात. तामिळनाडु प्रमाणे महाराष्ट्रात पण दोनच स्थानिक पक्षांना स्थान रहावे आणि आलटुन पालटुन आपल्याच घराण्याचीच सत्ता महारष्ट्रात असावी अशी स्वप्ने त्यांना पडत असतात. स्वप्न पहायलाच हवित. पण थोड वस्तुस्थितीच भान सुध्दा त्यांनी ठेवाव. तामिळनाडु सारखी भाषिक अस्मिता महाराष्ट्रात नाही. इतर कोणाही प्रांतापेक्षा मराठी माणूस हा जास्त राष्ट्रिय वृत्तीचा आहे. महाराष्ट्रापेक्षा भारत त्यांना मोठा वाटतो. वडापाव विकुन मराठी माणसाच हित कस होणार हे त्यास कळत नाही. कोणत्याही भांडवली व्यवसायात निव्वळ अस्मितेच भांडवल करुन मराठी माणूस कसा उंची गाठणार हे त्याला कळत नाही. हिंदुसभेने हिंदुंसाठी राजकारण केल म्हणजे नक्की काय हित साधल हे जस त्याला कळत नाही तसच मराठीचा मुद्दा घेऊन मराठीच राजकारण करणाऱ्यांनी, गेल्या ५० वर्षात, मराठी माणसाच अस नेमक कोणत व किती हित साधल हे त्यास कळत नाही. खळ्ळ-फटाक्‌ करुन नवनिर्माण झाल्याचीही कुठली नवि दृष्ये अद्याप त्यास दिसली नाहीत.
शेवटी शेवटी ज्या हिंदुंना हिंदुसभा साद घालत होती त्याच हिंदुंना स्वत:च हित कळत नाही, आम्हाला टाळ्या देता पण मते देत नाही, हिंदुंच्याच सर्वात मोठया संघटनेने पाठीत खंजिर खुपसला, म्हणून बोल लावु लागली. पण शेवटपर्यंत आपण हिंदुंची महासभा असून पण हिंदु आपल्याला मत का देत नाहीत, आपणच तर कुठे चुकत नाही ना, या गोष्टींच आत्मपरिक्षण त्यांनी केल नाही. अजुनही संघ , जनसंघ आणि आता भाजपा कसे वाईट आहेत यावरच विविध जहरी भाष्य करण्यातच त्यांचा वेळ जात असतो.
याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल तर , मराठी लोक आपणाला मराठीच्या मुद्द्यावर मत का देत नाहीत यावर मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करायची वेळ आली आहे, एखाद्या घराण्याची अस्मिता म्हणजे मराठी अस्मिता नाही. हिंदुत्व आणि मराठीत्व यांचे एकत्रीकरण हाच मराठी माणसाचा स्थायीभाव आहे.
जो विचारप्रवाह विकासाच्या साथीने या दोन्ही अस्मितांचे एकत्रिकरण, त्यातल्या त्यात जास्त करेल (हे नेहमी तुलनात्मक असते, दगडापेक्षा वीट मऊ हा मोजण्याचा काटा) व बेरजेचे राजकारण करुन वाटचाल करेल तोच महाराष्ट्रात यश मिळवेल.
-चंद्रशेखर साने

Wednesday, December 21, 2016

मराठे शाहिची १२८ वर्षे

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत काळ म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकापासून ( १६७४) ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करुन ब्रिटीशांची तैनाती फौज स्वीकारली तोपर्यंत १८०२ पर्यंत. १८१८ ची लढाई हि केवळ एक दिवा विझतानाची फडफड होती,सेनापती बापु गोखले यांचा आदरच आहे पण... खरा शेवट १८०२ ला दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटीशांचे मांडलिकत्व स्वीकारले तेव्हाच झाला.
या १२८ वर्षात अनेक चढ उतार व संकटे आली. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या संकटात, महाराष्ट्र धर्माला जागून मराठी हिंदुंनी २७ वर्षे कडवी झुंज देऊन औरंग्याला गाडला.
बाजीरावांनी भारतभर मुलुखगिरी केली तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात, रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी हिंदुंनी पार अटकेपर्यंत झेंडे रोवले.
पुढे पानीपतचे संकट आले. मराठी हिंदुंची अपार हानी झाली, पण तो जेत्यांना जिंकणारा पराभव होता. त्यानंतर काही काळातच थोरल्या माधवराव पेशव्यांनी हा पानीपतचा पराभव धुवुन काढला.
सवाई माधधवरावांच्या काळात खर्डयाला निजामाला धुळ चारली तो मराठी हिंदुंच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदु समजला जातो. नंतर मात्र उतरती कळा लागली.
पेशवाई हि राजकिय दृष्ट्या प्रगत असली तरी सामाजिक दृष्ट्या मात्र अप्रगत होती. याचा अर्थ असा नाही की सर्व काळ ती पोथी निष्ठ व अप्रगत होती, एकुण समाजात जेवढी परंपरागत सामाजिक गुलामी होती तितकीच पेशवाईत होती. पेशव्यांनी ती कमी केली नाही तशी वाढवली पण नाही.
चिमाजी अप्पा व थोरले माधवराव हे वैयक्तिक पातळीवर नैतिक सामर्थ्य असणारे व शूर पेशवे पण अल्पायु. थोरले माधवराव क्षयाने गेले नसते तर त्यांनी कदाचित काही सुधारणावादी योजना आखण्याला वाव दिला असता. पण त्या जरतर च्या गोष्टी.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशव्यांचे व एकुण सर्वच समाजाचे लाजिरवाणे अध:पतन झाले होते. हे अध:पतन थांबवणारी संत परंपराही खंडीत झाली होती. हे अध:पतन चारित्र्याच्या दृष्टीनेच केवळ नाही तर राष्ट्रिय दृष्टीकोनातून होते. परिणामी ब्रिटीशांचे फावले. ब्रिटीशांच्या राष्ट्रिय नैतिक सामर्थ्यापुढे भारतीय समाजाचे राष्ट्र म्हणून ढासळलेले नैतिक अधिष्ठान फार मोठे कारण आहे, केवळ लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे नाहीत, हे कारण नव्हते.
शिवाजी महाराजांच्या काळात हे नैतिक अधिष्ठान अत्युच्च पातळीवर होते म्हणून ते राष्ट्रनिर्माते होते.
अशा प्रकारे मराठा साम्राज्य त्यातील गुणदोषांसहित १२८ वर्षे टिकले.यावेळी राष्ट्रवादाची रितसर मांडणी हिंदुस्थानात नसली तरी या साम्राज्यात राष्ट्रीय दृष्टीकोन व भारतीय सीमांविषयी जाणीव पुरेपुर होती. पण ब्रिटीश राष्ट्राच्या शक्तीसमोर ते निर्बल ठरले.
आजही हिंदु एकता व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हे दोनच गुणच सध्याचे हिंदवी स्वातंत्र्य बळकट करतील. जातीविद्वेष हा सध्या प्रस्थापित असलेल्या हिंदवी राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक हिंदुने याविरुध्द लढणे हे कर्तव्य आहे.
-चंद्रशेखर साने

निरंजन पाल

खुर्चीवर बसलेल्या सावरकरांच्या शेजारी उभे असलेले गृहस्थ श्री. निरंजन पाल-
त्यांची थोडक्यात ओळख
पहिल्या पिढीतल्या लाल-बाल-पाल या त्रि-नेत्यांमधील श्री. बिपिनचंद्र पाल यांचे ते सुपुत्र-सावरकरांचे अनुयायी-अभिनव भारत चे सदस्य- ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते सावरकरांसमवेत उपस्थित होते व "सागरा प्राण तळमळला" या काव्याचे प्रथम उमटलेले शब्द सावरकरांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकुन कागदावर लिहुन घेणारे.
अभिनव भारतच्या पतनानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश, लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी- भारतात आल्यावर चित्रपट उद्योगातच प्रवेश केला.
निरंजन पालांनी "अछुत कन्या" या गाजलेल्या हिंदी सिनेमाचे पटकथा लेखन केले ( श्री. गांधी (महात्मा) ) यांनी पाहिलेला एकमेव हिंदी सिनेमा "अछुत कन्या" हाच होता बहुतेक -
१९५२ ला निरंजन पालांनी सावरकर भवनात येऊन सावरकरांच्या १८५७ चे समर या जगद्‌विख्यात ग्रंथावर चित्रपट काढण्यासंबंधी सावरकरांशी चर्चा केली, मात्र तो चित्रपट माहीत नसलेल्या कारणांनी प्रत्यक्षात आला नाही.
Image may contain: 2 people, people standing and suit

Tuesday, December 20, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयी सोयीचे

कला, अभिव्यक्ती यांवर पुरोगामी दहशत आणि मुस्लिम तुष्टीकरणात्मक धोरण ठेवणे याचा आधुनिक भारताचा इतिहास खूप मोठा व खेदजनक आहे. मी वाचलेली दोन उदाहरणे ,
कै.श्री.विश्राम बेडेकर यांचा शेजारी हा चित्रपट खुप गाजला. ग्राऊंड लेव्हलला हिंदु-मुस्लीम कसे एकत्र रहातात वगैरे सांगणारा आणि फाळणीच्या असपासच्या काळातला हा प्रबोधनपर चित्रपट. मला पण आवडला. धर्माच्या पलिकडे जाऊन मानवता जपावी, परस्परांत सौदार्ह जपावे आणि ते दुतर्फा असावे याचा मी पुरस्कर्ता आहे.
पण यात एक मेख अशी आहे, की या दोन हिंदु व मुस्लिम शेजाऱ्यात भांडण होऊन दुहीचे बीज पेरले जाते त्यात चुक दाखवली गेली ती हिंदु शेजाऱ्याची. यावर लेखक कै.विश्राम बेडेकर यांची त्यांच्याच एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रात आलेली टिपण्णी अशी की, हिंदु शेजाऱ्याची चुक दाखवणे योग्य होते कारण हिंदु हे सहनशील असल्याने ते त्यांना कमीपणा दर्शवणारी पटकथा सहन करु शकतात पण मुसलमान समाजाला ते रुचले नसते. म्हणुन त्यांनी पटकथेत हिंदु व्यक्तीचीच चूक दाखवणे आवश्यक व चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरवले व तसेच लेखन केले.
दुसर उदाहरण कै. सुधीर फडके यांच. फार पुर्वी त्यांना सावरकरांच्या "काळे पाणी " या कादंबरीवर एक चित्रपट काढायचा होता, व त्याची जुळवाजुळवही त्यांनी सुरु केली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने अट घातली की सावरकरांनी या कादंबरीतले रफीउद्दीन हे खलपात्र बदलुन ( सावरकरांनी रंगवलेले रफीउद्दीन हे पात्र ७००-७५ % माधव काझी उर्फ लखोबा लोखंडे प्रमाणे वागणारे आहे, हा योगायोग की सावरकरांचा भविष्यवेध , सत्यघटेनेचा व कादंबरीचा नेमका काळ तपासावा
लागेल) हिंदु नामक करावे, अन्यथा त्याच्याच सारखे दुसरे एक हिंदु खल पात्र पटकथेत सामिल करावे. लेखकाने काय लिहावे याचे दिग्दर्शन , निर्देशन व अटी सावरकर मान्य करणे शक्यच नव्हते व हा चित्रपटच बारगळला.( माझा व कै. सुधीर फडके यांच्यात सावरकर चित्रपटासंबंधात काही वाद १९८९ साली उद्‌भवला होता, आधी माझा लेख व त्यावर प्रतिवाद करणारा कै.श्री. फडके यांचा लेख "साप्ताहिक सोबत" मध्ये प्रसिध्द झाला, त्यात कै. फडके यांनी वरील दोन्ही हकीकतींना दुजोरा दिला होता.)
-चंद्रशेखर साने
संदर्भ:-
एक झाड दोन पक्षी- विश्राम बेडेकर
काळे पाणी आवृत्ती १९८४ - प्रस्तावना

Sunday, December 18, 2016

अख्खा हत्ती खाण्याची युक्ती

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन हिंडत असताना त्यास एक मेलेला हत्ती दिसला. तो बेहद्द खुष झाला. मेलेल्या हत्तीचे मांस आता त्याला खूप दिवस पुरणार होते. त्यास जिवंत ठेवणार होते.
पण तेवढ्यात त्यास सिंहाची डरकाळी ऐकु आली. कोल्हा चतुर होता. सिंहाला पाहताच तो नम्रपणे म्हणाला, या या महाराज आपलीच वाट पहात होतो, आपल्या साठीच मी या हत्तीची राखण करत थांबलो होतो. आपण जंगलाचे राजे, आपलाच या मांसावर हक्क !
वनराज खुष झाले, म्हणाले, तू माझा खरा नागरीक. पण आत्ता माझे पोट भरले आहे व तशीही मी दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो, तेव्हा तुझ्या एकनिष्ठेचे बक्षिस म्हणून हि शिकार मी तुला देऊन टाकतो.
कोल्हाने वाकुन नमस्कार केला आणि सिंह तेथून निघुन गेला.
कोल्ह्याने हत्तीचे निरिक्षण सुरु केले. हत्तीच कातड जाड आणि काळ केसाळ होत. कोल्ह्याच्याने ते एकट्याच्याने फाडणे अशक्य प्राय होते.
तेवढयात तिथे एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली.
कोल्हा हुशार होता, अजिबात न घाबरता तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वाघोबा, हि शिकार वनराज सिंहांनी केली आहे आणि मला ते राखण करण्यास सांगुन नदीवर स्नानास गेले आहेत, त्यांनी मला जो कोणी या शिकारीस तोंड लावेल त्याचे नाव सांगण्यास सांगितले आहे, विशेष करुन ते मला म्हणाले होते की त्यांना वाघाची फार चीड आहे, तु दिसलास तर मला लगेच सांगायला ये. तेव्हा तुला जर प्राणाची काळजी असेल तर त्वरित निघुन जा. ते ऐकताच वाघ सिंहाच्या भीतीने घाबरुन पळुन गेला.
आता हत्तीला कसे फाडावे याचा कोल्हा विचार करत असतानाच एक चित्ता तेथे आला. कोल्ह्याने विचार केला की श्रेष्ठास नैवेद्य दाखवुन, शूर पण दुष्ट वाघास श्रेष्ठाची भीती दाखवुन आपण काम साधले. आता आपल्यास वरचढ पण अन्य दोघांच्या तुलनेने शक्तीत कनिष्ठ अशा या चित्त्यास थोडी लालुच दाखवावी, हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे काम याच्याकडून करुन घ्यावे, कारण याचे दात व नखे फार अणकुचीदार आहेत.
असा विचार करुन तो चित्त्यास म्हणाला अरे भावा, हि शिकार सिंह महाराजांनी केली आहे व मला राखण करण्यास बसवले आहे.
चित्ता म्हणाला असे असेल तर येथुन पळुन जाणेच बरे.
कोल्हा म्हणाला, तू असा घायकुतीला येऊ नकोस, तू माझा भाऊ आहेस, तू फार भुकेलेला दिसतोस. मी असे करतो , एका बाजूला जाऊन मी सिंह येत नाही ना पहातो तोपर्यंत तू पोटभर खाऊन घे.
चित्ता भुकेला होताच, त्याने कोल्ह्याचे हे म्हणणे मान्य करुन हत्ती ला फाडण्यास सुरुवात केली. हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे आपले पुरेसे काम होताच कोल्हा ओरडला, अरे मुर्खा पळ पळ, महाराज येत आहेत. चित्ता घाबरुन पळुन गेला.
आता कोल्हा निवांत पणे चित्त्याने फाडलेल्या भागाचे मांस खाऊ लागला. तेवढयात दुसरा एक भुकेलेला आणि संतापलेला कोल्हा हत्तीचे मांस खाण्यासाठी धावुन आला.
कोल्ह्याने विचार केला श्रेष्ठास सामाने, दुष्टास भेदाने , कनिष्ठ चित्त्यास दामाने म्हणजे लालच दाखवुन त्यांच्यावर आपण मात केली.
पण हा कोल्हा आपल्याला तुल्यबळ आहे, नीतीशास्त्राप्रमाणे आपण याच्याशी संघर्ष आणि लढाई करणेच शौर्याचे लक्षण आहे. असा विचार करुन त्यानेही त्या कोल्ह्यावर उलट चढाई करुन त्यास पळवुन लावले.
अशा प्रकारे चतुर कोल्ह्याने राजनीतीशास्त्राने सांगितलेल्या साम, दाम, भेद व दंड अशा चारही युक्त्यांचा वापर करुन आपले अन्न स्वकष्टाने प्राप्त केले व बराच काळ आपला चरितार्थ सुखाने चालवला.
-चंद्रशेखर साने
पंचतंत्र कथा

Saturday, December 17, 2016

थोडा वेळ लागेल पण नोटाबंदीला यश १००%

********** थोडा वेळ लागेल पण यश १००% ************
मी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचा समर्थक आहे हे माझ्या कपाळावर लिहिले आहे का काय कळत नाही, पण मला आतापर्यंत एकाही बॅंकेत पैसे काढायला त्रास झाला नाही. सर्वत्र सुटे पैसे मिळत राहीले, cash counter असो वा ATM अर्ध्या तासा पेक्षा अधिक काळ कोठेही थांबावे लागले नाही.
जनता सहकारी बॅंकेत १०००, ३०००, ५००० अशा पधतीने रक्कम काढता येते आहे. त्यात नेहेमी एक हजार रुपये १०० च्या नोटात व बाकीचे दोन हजाराची नोट मिळाली. हे दोन हजार सुध्दा अगदी सहजी सुटे होत गेले. काही छोटे वा मध्यम व्यापारी लोक जेव्हा क्रेडीट/डेबिट कार्ड घ्या म्हटल्यावर नाही म्हणाले, तेव्हा त्यांच्यापुढे मी २००० ची नोट पुढे करत होतो, ते निमुट पणे मला सुटे देत होते. Pay tm* चे खात आहे व त्याच्या wallet मध्ये पण पैसे भरुन ठेवले आहेत , पण त्याचाही वापर करायची अद्याप एकदाही वेळ आली नाही.
रोकड सुलभता कायम राहिली आहे. अगदी घरकाम करणारे, भाजीवाले, फळवाले रिक्षा इ. बरोबर लहान लहान व्यवहार करताना कसलीही अडचण आली नाही adjust करावे लागले नाही. ATM वरच्या रांगा दिसल्या ते रांगेत का उभे रहातात हे पण कळले नाही, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थीच ८०% जास्त प्रमाणात रांगेत का दिसतात हे कोडे पण उलगडलेले नाही.
L.I.C., M.S.E.B. , Internet, Share Market, Telephone इ. बाबबत डीजिटल होऊन मला किमान पाच पासुन ते पंधरा वर्षे होऊन गेली. तीही अडचण नाही. ग्राहक पेठ गेली काही वर्षे कसलाही अधिक सरचार्ज न घेता क्रेडीट कार्ड accept करते आहे, त्यामुळे महिन्याच्या किराणा मालाचा प्रश्न नाही.
काही तथाकथित विद्वान, सुत्रसंचालकांसह, बकवास चर्चा करणाऱ्या न्युज चॅनेलवर १ दिनांकेपासुन परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी आक्षेपार्ह विधाने सर्रास करत आहेत, हि त्यांची चिंता नसून दंगली व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे, का मोदी आल्यापासून व नोटाबंदंच्या निर्णयानंतर पाण्याविना मासोळी सारख्या तडफडणाऱ्या अस्वस्थ लोकांच्या वतीने चर्चात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या या धमक्या आहेत यावर प्रशासन व पोलिस खात्याने विचार करायला हवा. कारण असे बडबडणाऱ्यांत मनात विष-भरलेले अराजकतावादी व नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक सुध्दा आहेत. मोदी आले तर देश सोडुन जाऊ म्हणणारे, पुरस्कार वापसी करणारे, भारत के तुकडे होंगे हजार म्हणणारे अस्वस्थ आहेत. मोदी आल्यावर दंगली होऊन अमुक एक हजार लोक मरतील वगैरे वाचाळपणा करणारे सुध्दा हतबल झालेत. आपल्या थयथयाटाने भूकंप होईल अशी आशा बाळगुन आहेत. पण मोदींची प्रशासनावर उत्तम पकड आहे याची खात्री आहे. त्यामुळे या धमक्या प्रत्यक्षात उतरावयाला गेले तर त्यांचे काळे चेहरे जगापुढे उघडे पडतील.

नोटाबंदीचा निर्णय हा दीर्घकालिन निर्णय आहे वार्षिक ताळेबंद मांडुन त्याचा परीणाम कळणार नाही.

पुर्वी पण रु. १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या , आता वेगळा काय फरक पडेल अस वाटणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की आता मानसिकतेत फरक पडणार आहे.
पुर्वी खाल्लेला पैसा सुरक्षित असण्याचा फील असायचा करप्ट लोकांना !
आता कोणत्याही क्षणी वाममार्गाने मिळवलेला पैसा मातीमोल करण्याची ताकद सरकारी यंत्रणेत असल्याची खूणगाठ बांधली आहे भ्रष्टाचारी लोकांनी मनाशी.
सरकारने- शासनाने आपल कणखर अस्तित्व दाखवुन, आमच कोण काय वाकड करु शकणार आहे या भ्रष्टाचारी मानसिकतेवर केलेला आघात पण इतर फायद्यांप्रमाणेच कमी महत्वाचा नाही. निगरगट्ट कातडी असलेल्या लोकांच्या मनात सुध्दा या निर्णयाने धडकी भरवली आहे.
पुर्वीचे १००० रु कोणाला सहसा दिसायचे पण नाहीत. आता पाचशे नोटेचे पण अवमूल्यन झाले आहे. अगदी तळागाळाच्या व्यवहारात सुध्दा भ्रष्ट्राचार होतो त्यालाही हा दणका आहे. मोठे भ्रष्टाचार धोक्याचेच पण ते सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भिडत नसतात, रोजच्या आयुष्यावर परिणाम दिसायला दिर्घकाल जात असल्याने जाणवत नाहीत. पण चतुर्थ श्रेणीतल्या भ्रष्टाचाराला सर्वसामान्य मनुष्याला प्रत्यक्ष भिडावे लागते व तो एकाच वेळी त्याचा शोषक आणि शोषित अशा दोन्ही भूमिका निभावतो, हि तर एक विलक्षण स्थिती आहे. मला भ्रष्टाचार्यांना पैसा द्यावा लागतो म्हणून मी पण दुसरी कडून पैसे खाणार असे हे दुष्ट चक्र भारतात तयार झाले आहे.
सरकारच्या या आणि येऊ घातलेल्या पुढील कडक पावलांनी हे दुष्टचक्राचा लवकरात लवकत भेद व्हावा, हि लढाई आपल्या सगळ्यांची आहे. तात्पुरत्या फायद्या तोट्यांकडे पाहुन रुसुन बसण्याची नाही.
अर्थक्रांतीमधले नोटाबंदी हे केवळ पहिल पाऊल आहे. मागचा काळा पैसा खणुन निघेल तेवढा निघेल पण यापुढे काळा पैसा निर्माणच होऊ नये या व्यवस्थेची बिजे या निर्णयात रोवली आहेत. दहशतवादाला आळा हा एक साईड इफेक्ट आहे. आत्मघातकी लोकांना केवळ नोटाबंदीने रोखता येत नाही हे लहान पोरांनाही कळते.
जर पुढची टर्म मोदींनाच मिळली तर हि लढाई अधिक प्रभावशाली होईल. दुसरे कोणी आले तर परत मंदावेल, पण अगदीच उलटे निर्णय घेतले नाही गेले तर थांबणार नाही आता. रोकडमुक्त व्यवहार ही २१ व्या शतकाची पाऊलवाट ठरेल.
पुढची टर्म पण मोदींना मिळाली (ती मिळेल याचीच जास्तीत जास्त शक्यता आणि अपेक्षा आहे) तर निवडुन आल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे २०२२-२३ मध्ये रु. २०००/- ची नोट सुध्दा क्रमाक्रमाने रद्द केली जाईल यात शंका नाही. २०१९ ला सुध्दा मोदींकडेच नेतृत्व येणे देशाच्या व राष्ट्राच्या हिताचे असेल.

© चंद्रशेखर साने

Friday, December 16, 2016

तुका म्हणे ऐशा नरां

तुका म्हणे ऐशा नरां मोजुनी माराव्या पैजारा ***
प्रत्येक कैद्याला तुरुंगातील कामाचा भत्ता मिळतो. तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात त्याचे पुनर्स्थापन करायचे कोणत्याही शासनयंत्रणेचे धोरण आणि कर्तव्य असते. मग ती परकिय असो वा स्वकीय.
इतर अनेक राजबंद्यांना जशी* राजक्षमा मिळाली तशी सावरकरांना त्यांच्या कोणत्याही सुटकेच्या अर्जांसाठी ब्रिटीशांनी कोणतीही क्षमा केली नाही. व अंदमानातुन सोडले सुध्दा नाही. तर त्यांना अंदमानातून केवळ रत्नागिरीच्या तुरुंगात हलवले. त्यामुळे सावरकरांना मुळात अर्जांवर आधारीत क्षमा दिलीच गेली नाही. कारण ब्रिटीश त्यांचे सुटकेचे अर्ज म्हणजे केवळ सुटका करुन घेण्याची चाल असल्याचे ओळखुन होते. त्यांना सोडुन देण्यास ब्रिटीशांसारखा धुर्त शत्रू मुर्ख नव्हता.
नंतर दोन अटी म्हणजे रत्नागिरीत स्थानबध्द राहीन व राजकारणात भाग घेणार नाही या आणि केवळ याच दोन अटींवर सावरकरांना तुरुंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबध्द केले गेले. जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत आणि कोणाही सहकाऱ्याची नावे , कटासंबंधी माहिती विचारायची नाही या सावरकरांच्या मुख्य प्रतिअटी होत्या त्या ब्रिटीशांनी मान्य केल्या. स्थानबध्दतेच्या काळात म्हणजे १९२४ ते १९३७ अशा १३ वर्षांच्या काळात त्यांच्या वर पोलिसांची नजर असे. गुप्त पोलिस पाळतीवर असत. त्यांची वकिलिची पदवि रद्द केली होती व सनद दिलिच गेली नाही त्यामुळे वकिली करणे अशक्य होते , इतकेच नव्हे तर BA ची पदवी पण काढुन घेतली होती, तसेच त्यांच्यावरच्या राजद्रोहाच्या गुन्ह्यामुळे त्यांना नोकरी मिळणे अशक्य होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या सासऱ्यांची पण सर्व मालमत्ता जप्त केल्याने ( त्यांचा चष्मा व अंगावरचे कपडे सुध्दा जप्त केले गेले होते व तुरुंगात ते वापरत असलेला चष्मा आणि कपडे ही सुध्दा सरकारी मालमत्ता होती. तुरुंगातून पुढे १९२४ ला सुटल्यावर सुध्दा त्यांना एका स्नेह्याने दिलेले कपडे घालावे लागले होते) त्यांना उपजिविका करणे अशक्य होते. व स्थानबध्दता म्हणजे पण एक प्रकारे तुरुंगवासच असल्याने त्यांना भत्ता मिळणे योग्यच होते, त्यास पेन्शन वा निवृत्तीवेतन नाही तर तुरुंग भत्ता म्हणतात. तुरुंगात जेवणखाणाची सोय हि सुध्दा एखादा कृतघ्न माणूस सावरकर तुरुंगात ब्रिटीशांचे अन्न खात बसले होते असे म्हणु शकेल. हा भत्ता सुध्दा त्यांना १९२९ पासुन मिळु लागला आधीची पाच वर्षे नाही. १९३७ पर्यंत हा तुरुंग भत्ता सावरकरांना मिळत असावा, उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नव्हते. ६०/- ही त्या काळात अत्यंत तुटपुंजी रक्कम होती (जो इतर बंगाली राजबंद्यांना रु. १००/- मिळत असे) व त्यांच्या त्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन गांधीवादी विचारवंत व सावरकरवादी नसणारे संशोधक कै.श्री. य.दी.फडके यांनीच करुन ठेवले आहे. ते सर्वांना मान्य व्हायला हरकत नाही. या काळात सावरकर जे लेखन करत त्याचे तुटपुंजे मानधन व धाकट्या भावाची थोडीशी आर्थिक मदत एवढच त्यांना मिळत होते.
जे कोण लोक या उपजिविकेची सर्व साधने काढुन घेतल्याने, ब्रिटीश सावरकरांना चरितार्थ चालवण्यासाठी देत असलेल्या ६० रु भत्त्यावर (जी त्या काळात सुध्दा अत्यंत तुटपुंजी रक्कम होती) बोट दाखवत असतील ते सर्व एक नंबरचे हलकट वृत्तीचे आणि माणुसकीला काळीमा असलेले नीच मनुष्यच असू शकतात. "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा" , पण यांना पैजारांनी म्हणजे जोड्यांनी बडवले तर जोड्याचाच अपमान होईल.
-चंद्रशेखर साने

Friday, December 2, 2016

Name of Story - हा देश एक मुर्खांचा बाजार


एका पर्वतावरील वृक्षावर 'सिंधुक' नावाचा एक पक्षी राहात होता. त्याच्या विष्ठेतून सोन्याचा रवा पडे. एकदा त्या वृक्षाजवळून एक पारधी चालला असता, तो सिंधुक त्याच्या समक्ष शिटला. त्याच्या विष्ठेत चमकत असलेले सोने पाहून त्या पारध्याने त्याला जाळ्यात पकडले.
मग त्याला घेऊन घरी जाताना तो पारधी मनात म्हणाला, विष्ठेतून सोने देणारा पक्षी मजपाशी आहे हे वृत्त जर राजाला कळले, तर तो या पक्ष्याला तर घेऊन जाईलच, पण त्याशिवाय तो मलाही शिक्षा ठोठवील. त्यापेक्षा हा पक्षी राजाला नेऊन दिलेला बरा. मनात असे ठरवून त्याने त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य राजाला सांगून, त्याला त्याच्या हवाली केले आणि राजाने त्या सिंधुकाला एक सेवेकाकरवी पिंजर्‍यात अडकविले.
तेवढ्यात त्या राजाचा प्रधान तिथे येताच, जेव्हा राजाने त्याला त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य सांगितले, तेव्हा तो म्हणाला, 'महाराज, पक्ष्याच्या विष्ठेतून सोने निघणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त करा.' राजाने त्याप्रमाणे करताच तो पक्षी एका उंच जागी जाऊन शिटला. त्या विष्ठेतून चमचमणारे सुवर्णकण पाहून राजा म्हणाला, 'अरेरे ! विष्ठेतून सोने देणार्‍या या पक्ष्याला सोडून देणारा मी मूर्ख आहे !'
यावर सिंधुक पक्षी म्हणाला, 'हे राजा, या जगात तू एकटाच काही मूर्ख नाहीस. पारध्याच्या समोर सुवर्णभरित विष्ठा शिटलो तर तो आपल्याला पकडील ही गोष्ट कळत असूनही, मी त्याच्या समक्ष शिटलो व स्वतःहून त्याच्या जाळ्यात सापडलो. तेव्हा तुझ्याप्रमाणे मीही एक मूर्खच आहे. आणि तो पारधी ? विष्ठेतून सुवर्ण देणार्‍या मला पाळून स्वतः श्रीमंत होण्याऐवजी त्याने मला तुझ्या स्वाधीन केले ! तेव्हा तुझ्या-माझ्याप्रमाणे तो पारधीही मूर्खच ! थोडक्यात सांगायचे तर या जगात शहाणे थोडे. सगळीकडे मूर्खांचाच बाजार ! हा देशच एक मुर्खांचा बाजार आहे
एवढे बोलला आणि तो पक्षी उडून गेला.
Source पंचतंत्र
महत्वाची तळटिप :- सोन्यासंबंधात अर्धवट बातम्या आणि अफवा वाचुन आपापल्या प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या फेसबुकी बुध्दीमंतांचा या कथेशी काहीही संबंध नाही. मला असच जुनपान वाचलेल काहिबाही आठवत आत अधुनमधुन

No automatic alt text available.No automatic alt text available.No automatic alt text available.

Wednesday, November 30, 2016

आंबेडकरांचे नेतृत्व दलितात सर्वमान्य होते का?

आंबेडकरांची राजकिय चळवळ नंतरच्या काळात केवळ विशिष्ट समाजाच्या हक्कांपुरती मर्यादीत झाली , तर सावरकर समस्त हिंदु समाजाच्या हिताचा विचार करत होते, दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने ते एकमेकांचे राजकिय विरोधक होते त्यामुळे आंबेडकरांनी जे लिहिले तेच प्रमाण मानायची गरज नाही. आंबेडकरांना सावरकरांच्या राजकारणावर टिका करणे गरजेचे होते कारण ते त्यांचे समाजकारणात पण प्रतिस्पर्धी होते, मूलत: आंबेडकरांची जात सोडता अन्य अस्पृश्य समाजात सावरकरांना मान होता तो आंबेडकरांना डाचत असे त्यामुळे त्यांनी सावरकरांविषयी काही वेळा पक्षपाती लिहिले आहे.
विशेषत: मालवण ला १९२९ ला जी फार मोठी पुर्वास्पृश्य परिषद झाली, त्यात अध्यक्षपदासाठी आंबेडकर व सावरकर अशी दोन नावे पुढे आली. परंतु अन्य पुर्वास्पृश्य, विशेषत: चर्मकार समाजाचा आंबेडकरांच्या नावाला प्रखर विरोध होता , सावरकरांचे नाव मात्र सर्वच दलित मंडळींना पसंत होते, व शेवटी सावरकरांचीच अध्यक्ष म्हणुन निवड झाली.
सावरकरांचे समाजकार्य पाहुन बहुजन मंडळी प्रभावित झाली होती. शाहु महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्र गुरु शंकराचार्य यांनी सावरकरांची थोरवी या समारंभात व रत्नागिरीत पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून मान्य केली. महर्षी वि.रा. शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकाने तर ईश्वराने आपलेही आयुष्य सावरकरांना द्यावे एवढे त्यांचे समाजकार्य महान आहे असे म्हटले.
मानवी स्वभाव लक्षात घेता या घटनांनंतर आंबेडकरांना व आंबेडकरी समाजाला सावरकर हे शत्रु वाटु लागले असण्याची शक्यता आहे. खरतर सावरकरांनी रत्नागिरीला आंबेडकरांना आमंत्रण देऊन आपण केलेल्या सुधारण व कार्य प्रत्यक्ष पहाण्यास व अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत करण्यासंबंधी पत्रही लिहिले. पण आंबेडकरांनी बहुदा हे आमंत्रण हेतुत: चुकवले व केवळ ऐकिव माहितीवर सावरकरांवर समता पत्रातुन टिका करणे चालु ठेवले. सावरकरांसोबत असलेले दलित नेते परोपरीने आंबेडकरांना सावरकरांशी युती करण्यासंबंधी सुचवत राहिले पण आंबेडकरांनी राजकीय नफ्या-तोट्याचा विचार करुन त्यांची उपेक्षा केली कारण त्यांन राजकारणात आत्मप्रस्थानाची गरज होती. (गांधीजी मात्र सावरकरांना भेटुन गेले कारण त्यांची राजकीय प्रस्थापना आधीच झाली होती.) तसच सावरकरांना भेटण म्हणजे त्यांच्या तेजस्वी व्यक्तीमत्वा समोर झाकोळून जाणे.( आपल्या जातीसंस्थेचे वास्तव शेवटी असे आहे की ज्याच्यासाठी लढले गेले ती जात दुसऱ्या जातीचा नेता असला तरी संशयानेच पहाते त्यात सावरकर तर ब्राह्मण, त्यामुळे आंबेडकर व त्यांची विशिष्ट जात यांनी सावरकरांकडे एक राजकीय स्पर्धक असेच पाहिले, याउलट इतर वंचित जातींना आंबेडकरांच्या तोडीचा नेता न मिळाल्याने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, सावरकरांचा तितकासा द्वेष वाटत नाही व ते सावरकरांचा पण कृतज्ञता बुद्धीने आदर करतात, निदान गलिच्छ पध्दतीने लिहित तरी नाहीत.) आंबेडकरी समाज मात्र काही सन्माननीय लेखकांच अपवाद वगळता सावरकरांनी दलितांसाठी इतके मोठे समाजकार्य करत असूनही सावरकरांचा तिटकारा करताना दिसतो, याचे मुख्य कारण इतर समाज सतत हिंदुत्वाच्या प्रवाहातच राहिले. आंबेडकरांनी मात्र सावरकरी व्याख्या नाकारत हिंदु म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा करत मुळातच भारतात जवळपास तृणवत जालेला बौध्द धम्म हिंदुत्वाच्या कक्षेतुन बाहेर काढला.
पुढे राजकीय अपरिहार्यता म्हणून कॉंग्रेस विरुद्ध काही काही निवडणुकांत आंबेडकरांनी सावरकरांशी हात मिळवणी केली.
जर अवतार आणि दैवत या कल्पना सोडून अभ्यास केला तर सर्व थोर थोर व्यक्तींचे मानवी पातळीवर मुल्यमापन करणे शक्य आहे. अन्यथा नुसत्याच आरत्या ओवाळत रहाणे सहज शक्य आहे, ज्यला तसे करायचे त्याने तसे खुशाल करावे, माझा तो मार्ग नाही. मी कोणत्याच महापुरुषाला नुसते "अवतार" मानत नाही. ते खूप मोठे असले तरी त्यांचा अभ्यास करताना आपण तटस्थ असावे अशी माझी भूमिका आहे.

Saturday, April 2, 2016

सावरकर: अंदमानपुर्वीचे व अंदमाननंतर


सावरकरांना अंदमानातच जिहादाचे खरे रुप समजून आले. अंदमानात त्यांना मुस्लीम अधिकाऱ्यांच्या जिहादि वृत्तीचा अर्थ कळला. अंदमानतच सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केला. केवळ इंग्लिश भाषांतरावर विसंबुन न राहता , इतरही पुस्तके अभ्यासली. तसेच एका मुस्लीम कैद्याकडून सश्रद्ध मनाने गेय स्वरुपातले, आवाजातील चढ उतार असलेले मूळ अरबी कुराणही ऐकले. अभिनव भारतात मुस्लीम सदस्य होतेच त्यांच्यातील काहिंशी सावरकरांची खूप मैत्री जमली होती असे सेनापती बापट यांनी नमूद केले आहे. मदनलाल धिंग्रा मात्र "इन लोगोंपर ज्यादा भरोसा मत करो" असे सावरकरांना म्हणत असत. सावरकरांची इस्लाम विषयी सर्व मते नंतर बदलली. हिंदुमहासभेत मुस्लीमांना घेऊ नये यावर ते ठाम होते. हिंदुमहासभा फुटुन जनसंघाची स्थापना याचे मुख्य कारण श्यामाप्रसाद मुखर्जी व संघाला सत्तेत यायचे असेल तर मुसलमानांची मते मिळाल्याशिवाय ते शक्य नाही असे वाटत होते, सावरकरांना सत्तेच्या राजकारणासाठी जनसंघ स्थापन झाला तेव्हा तो हिंदुहित पहाणारा पक्ष न उरता त्याची दुसरी कॉंग्रेसच होईल अशी भीती वाटत होती. सत्ताकारण करणाऱ्याला या ना त्या स्वरुपात मुस्लीम लोकानुनय करावा लागतो. सावरकरांना निर्भेळ हिंदुहित जपणारा पक्ष अस्तित्वात हवा होता, ज्याचे आज अस्तित्व उरलेले नाही.

१८५७ चे समर हे हिंदुंसाठी स्वातंत्र्य युद्ध तर मुसलमानांसाठी जिहादच होता. या संघर्षाचे हे दोन पैलु आहेत.

या ग्रंथाने सावरकरांना फार मोठी प्रसिद्धी व स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती म्हणून स्थान मिळाले. या पुस्तकाचे योगदान फार मोठे आहे. आम्हाला १९३७ चे सावरकर नकोत १९०८ चे हवेत असे म्हणणाऱ्यांना सावरकरांची १८५७ संबंधातली मुसलमानांसंबंधी घेतलेलि भूमिका परत घ्यावी असे वाटत होते, पण सावरकरांना स्वत:ची चूकिची भूमिका समजली होती. त्यांनी यानंतर एका भाषणात गोंधळ घालणाऱ्या समाजवादी/साम्यवादी तरुणांना उद्देशून १९०८ चे सावरकर पटायला ३० वर्षे लागली तसे १९३८ चे हिंदुत्ववादी सावरकर समजायला अजून ५० वर्षे असे उद्‌गार काढले. तथापि ज्यांना आज १९०८ चे सावरकर पटत आहेत त्यांनी तसे कार्य करण्यासाठी हात वर करावेत असे आवाहन केल्यावर मात्र सर्व अतिउत्साही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची दातखीळ बसली व आमची कोणाचीही हात वर करायची हिंमत झाली नाही, असे तेथे उपस्थित असलेल्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

Monday, March 14, 2016

महाकाव्यातल्या नीतीकल्पना



रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले.  रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.


दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.

शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्‌गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.

रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
 अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत६ असतात. न बुद्धीभेदं जनयेद !




Sunday, March 13, 2016

आझादीचे स्त्रोत आणि स्तोत्रकार

मोक्ष मुक्ती हि तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।।

स्वातंत्र्याच , मुक्तीच आणि उर्दुतल्या "आजादी" शब्दाच स्तोत्र लिहिणारे आणि गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज मरु घातलेली कॉंग्रेस आणि मेलेल्या लाल बावटयांचे मुख्य शत्रु झाले आहेत. सर्व पातळी सोडुन ते सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्तमानकाळात सावरकर हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे शत्रु ठरलेत हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या सावरकर द्वेषाला वैचारिक प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्रातले व बाहेरचे अभ्यासक समर्थ आहेत, कारण हे सर्व आरोप मुख्यत: वस्तुस्थितीपेक्षा द्वेषावर आधारित आहेत. असे आरोप खोडणे फार सोपे असते. मग हे विरोधक असे का करत आहेत? त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडॆ हिंदुत्ववादी अथवा भाजपा अथवा मोदी सरकार विरुद्ध फारसे विरोध करण्यास हातात काही उरलेले नाही. काही घटना वा कमी वकुबाच्या व्यक्तींचा वापर करुन अकांडतांडव करुन मोदी व भाजपा यांची लोकप्रियता घटल्याचे भ्रामक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करुन स्वत:च निर्माण केलेल्या आनंदवनभुवनी गुंगीत रहाणे हेच त्यांना सध्या शक्य आहे व तेच ते करत आहेत. मुख्य विषयांकडचे लक्ष भलतीकडे वळवणे हे खरतर सत्ताधारी पक्षाच्या फायद्याचे असते त्या ऐवजी हे काम विरोधक करत आहेत हि आश्चर्याचीच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या कही अंशी असलेल्या यशाची पावती आहे.

सावरकरांची प्रतिमा मलिन करुन त्यांना काहीही हातात लागणार नाही, सावरकरांवर आचरट आरोप करुन मोदी वा भाजपा चिडेल, हिंदुत्ववाद्यांना चिडवुन त्यांच्या कडून काही आततायी कृत्य घडेल असे त्यांना वाटत असेल तो शुद्ध राजकिय़ मुर्खपणा आहे. कारण कॉंग्रेसने जसे ५०-६० वर्षे गांधीजींचे नाव वापरुन त्यांच्या महात्मेपणाचा सत्ता मिळवण्यासाठी दुरुपयोग केला तसा सावरकरांच्या नावावर अथवा विचारांवर मोदी वा भाजपा सत्तेवर आलेलीच नाही. त्यांना सावरकर हे गांधीजीं इतपतच आदरणीय आहेत, अनुसरणीय आहेतच असे नाही. त्यामुळे सावरकरांची प्रतिमा मलिन करुन उद्रेक वगैरे काही होण्याची शक्यता नाही. मागच्या वेळी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने अंदमानात सावरकरांचे स्मृतिचिन्हाबाबत तालिबानी वृत्तीचे प्रदर्शन घडवले होते तेव्हा अगदी पुण्यात कै.श्रीमती हिमानी सावरकर लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यांनाही साधारण दोन वेगवेगळ्या आकड्यांनुसार १००० किंवा ५००० इतकीच मते मिळली होती. त्यावेळी कै.प्रमोद महाजनांनी स्पष्टपणे सांगितले होते की सावरकरांचे नाव वापरुन मते मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्या नावावर मते मागण्याचा प्रश्नच येत नाही किंवा सावरकर कुटुंबातल्या व्यक्तीला ही पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही.
तरिही हा सावरकर द्वेष का होत आहे? तर याचे एकमेव कारण कॉंग्रेस व साम्यवादी सटपटले आहेत हे एकमेव कारण आहे. सावरकरांवर पातळी सोडून आणि खोटी व वाह्यात टिका करणे हे त्यांचे नैराश्य आणि दिवाळखोरी या व्यतिरिक्त काही नाही. महाराष्ट्रात तर या यामुळे यांना मतांसाठी फायदा न होता उलट लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा जास्त मलिन होत आहे. कारण गांधीजींवर हिन पातळीवर टिका करुन नथुरामवाद्यांचे जे नुकसान झाले तेच सावरकरांवर हिन पातळीवर टिका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
सावरकरांना भारतरत्न देणे न देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. शिवसेनेची मागणी या व्यतिरिक्त तसा कोणताही प्रकारे या गोष्टीचा मागमुसही प्रत्यक्षात दिसत नाही. अंदमानातले सावरकरांचे माजी उद्धट पेट्रोलियम मंत्र्याने उखडलेले स्मरणपट्टीका दोन वर्षे झाली तरी निर्माणाचे काम आरामात चालु आहे. भारतात स्वच्छता अभियान ते अमेरिकेत ओबामांना गांधीगीता देण्यापर्यंत मोदी सर्वत्र गांधीनामच जपत आहेत. अशावेळी सावरकरांविषयी द्वेष या तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचे नाव घेणाऱ्यांच्या मनात उफाळुन येणे हे अतिशय केविलवाणे चित्र आहे. ज्या पातळीचे पोरकट आणि उडाणटप्पु नेतृत्व त्यांना लाभले आहे त्याचा हा दृष्य परीणाम आहे.

सावरकरांची केली जाणारी बदनामी आणि आक्षेप यांना वेळोवेळी अभ्यासु व तथ्यांवर आधारीत उत्तरे सावरकरांच्या चाहत्यांनी वेळोवेळी दिली आहेत व पुढेही देत रहातील. शत्रू याबाबत अत्यंत कमकुवत असल्याने हे फारच सोपे काम आहे. प्रश्न फक्त प्रचारतंत्राचा आहे. त्यात मोदी वाकबगार आहेत. असल्या घटनांचे संधीत रुपांतर कसे करायचे ते त्यांना चांगले माहित आहे. गांधी, पटेलांच्या प्रतिमेचे त्यांनी कॉंग्रेसकडून स्वत:कडे हस्तांतरण करुन घेतलेच आहे, पण ज्या सावरकरांच्या नावावर मत मिळत नाहीत त्यांच्या बदनामीचा एक अदृष्य फायदाच त्यांना मिळणार आहे. सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकासारखे (Catalyst) आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही, पण प्रक्रीया घडवुन आणण्यात मात्र तो सहाय्यकारी होतो. उत्प्रेरक एकतर रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो अथवा कमी करतो पण स्वत: मात्र निर्लेप रहातो. सावरकरांचे विचार हे प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होताना दिसत नाहीत, त्यांचे नावही देशात सरसकट माहित नाही , १०० हून जास्त वर्षे त्यांच्या नावाचा व विचारसरणीचा विरोध , द्वेष आणि गैरसमज करुन देणे चालु आहे पण तरिही सावरकरांचे नाव मिटवणे विरोधकांना शक्य झाले नाही. उत्प्रेरक (Catalyst) म्हणून भारतीय राजकारणात सावरकरांचे असलेले अस्तित्व अढळ आहे.

- लेखक चंद्रशेखर साने
.......................xxx..........................

माझी वाचनयात्रा

वयाच्या साधारण ८ व्या वर्षापसून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग.शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण तो फारसा टिकला नाही. दहावीच्घ्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच.समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. केतकर आल्यावर मटा चा सोटा म्हनजे सोनिया टाईम्स झाला होता. मग आपोआप मटा सुटला.
मराठिची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी दहा पुस्तके :
.
१. कर्मयोग - स्वामी विवेकानंद
२. सावरकरांचा बुद्धीवाद एक चिकित्सक अभ्यास- शेषराव मोरे
३. समग्र सावरकर
४. भ्रम आणि निरास- डॉ. नरेंद्र दाभोळकर
५. सावरकरांचे समाजकारण- सत्य आणि विपर्यास- शेषराव मोरे
६. शोध भानामतीचा- शाम मानव
७. स्वामी विज्ञानानंद यांची साहित्यसंपदा
८. वीरधवल- नाथमाधव
९. उष:काल- ह.ना.आपटे
१०. योगवासिष्ठ (३ खंड )
-चंद्रशेखर साने

लोकशाही, पक्षिय राजकारण आणि सावरकर

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

Wednesday, March 2, 2016

टाळ्या दिल्यात मत नाही दिलित

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

गांधी हत्येनंतरही हिंदुमहासभेचे चार खासदार लोकसभेत गेले होते. जानेवारी १९५२ मध्ये झालेल्या या निवडणुकितले हिंदुमहासभेचे खासदार होते प्रा. विघ देशपांडे (गुणा व ग्वाल्हेर दोन्ही तून विजयी झाल्याने यातल्या ग्वाल्हेरच्या जागेचे त्यागपत्र दिल्यावर तेथुन परत हिंदुमहासभेचेच डॉ. ना.भा.खरे निवडुन गेले. तिसरे खासदार निर्मलचंद्र चट्टोपाध्याय. ( कम्युनिस्ट लिडर सोमनाथ चटर्जी यांचे वडील.) उत्तरप्रदेशातून राखीव मतदारसंघात हिंदुमहासभेचे कॅ. राम गरिबा व पाचव्या सौ. शकुंतला नय्यर अशी यांची नावे.
ग्वाल्हेर मधुन नंतर लेखादेवी उर्फ राजमाता विजयाराजे शिंदे यांना नंतर कॉंग्रेसने फोडुन मध्यप्रांतात हिंदुमहासभेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. पुढे त्या जनसंघात आल्या.
हिंदुमहासभेला नथुरामाच्या कृत्यामुळे काही अंशी नुकसान झाले तरी त्यापेक्षा इतर काही जास्त कारणे होती. जर संघ आणि जनसंघियांनी सुचवल्याप्रमाणे जनसंघ, रामराज्यपरिषद व हिंदुमहासभा हे तीन पक्ष एकाच नव्या पक्षात विलीन झाले असते तर जास्त फ़ायदा लवकर झाला असता.
नविन पक्षातल्या नावात हिंदू शब्द असू नये व इतर धर्मियांनाही नव्या पक्षात स्थान असावे या प्रस्तावास सावरकर अनुकूल नव्हते.
पुढे पुढे जनसंघाने राजकारण करावे आणि हिंदुमहासभेने धार्मिक व सामाजिक कार्य पहावे हा गोळवलकरांचा प्रस्तावही हिंदुसभेला मान्य झाला नाही.
नेहरू पटेलांनी या राजकीय वादाचा फ़ायदा घेतला याविषयी त्यांना दोष देता येत नाही . विरोधी पक्ष रक्तपात न करता नष्ट करता यावा म्हणुन त्यात फाटाफुट घडवणे वा तिला प्रोत्साहन देणे हा लोकशाही मार्ग होता, राजकीय चातुर्य होते, आर्थिक बळही होते.
संघाचा विस्तार गुरुजींच्या काळात कित्येक पटींनी वाढला. ताकद वाढलेल्या गुरुजींनी हिंदुमहासभेचा नाद सोडून १९७१ साली धार्मिक कार्यासाठी विश्व हिन्दू परिषदेची स्थापना केली. भारतिय मजदुर संग , वनवासी कल्याण आश्रम , सामाजिक समरसता मंच अशा कितीतरी प्रकारे संघ विस्तारत गेला.

तात्पर्य :- सावरकर लोकशाही वादी होते यात शंका नाही पण त्यांना लोकशाहीतले राजकारण, जनमताची मानसिकता व निवडणुका जिंकन्याचे तंत्र अजिबात कळत नव्हते. किंवा कसही करून निवडणुका जिकणे हे त्यांचे ध्येय नव्हते, प्रकृति व वयही नव्हते.

Saturday, February 27, 2016

माझी वाचनयात्रा

माझी वाचनयात्रा
वयाच्या साधारण ८ व्या वर्षापासून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग. पारायण करुन मनमुराद हसत असे. शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण कविता करण्याचा नाद फारसा टिकला नाही. मात्र दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते उदाहरणे म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच. समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि कुसुम अभ्यंकर, कुमिदिनी रांगणेकर, मंगला गोडबोले, शांता शेळके अशा अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. श्री. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. कुमार केतकर आल्यावर त्यांनी मटा चा सोटा म्हणजे सोनिया टाईम्स केला होता. मग आपोआप म.टा. हातातून सुटला.
मराठीची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी भाषा संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
-चंद्रशेखर साने

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...