Monday, March 14, 2016

महाकाव्यातल्या नीतीकल्पना



रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले.  रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.


दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.

शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्‌गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.

रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
 अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत६ असतात. न बुद्धीभेदं जनयेद !




Sunday, March 13, 2016

आझादीचे स्त्रोत आणि स्तोत्रकार

मोक्ष मुक्ती हि तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।।

स्वातंत्र्याच , मुक्तीच आणि उर्दुतल्या "आजादी" शब्दाच स्तोत्र लिहिणारे आणि गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज मरु घातलेली कॉंग्रेस आणि मेलेल्या लाल बावटयांचे मुख्य शत्रु झाले आहेत. सर्व पातळी सोडुन ते सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्तमानकाळात सावरकर हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे शत्रु ठरलेत हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या सावरकर द्वेषाला वैचारिक प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्रातले व बाहेरचे अभ्यासक समर्थ आहेत, कारण हे सर्व आरोप मुख्यत: वस्तुस्थितीपेक्षा द्वेषावर आधारित आहेत. असे आरोप खोडणे फार सोपे असते. मग हे विरोधक असे का करत आहेत? त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडॆ हिंदुत्ववादी अथवा भाजपा अथवा मोदी सरकार विरुद्ध फारसे विरोध करण्यास हातात काही उरलेले नाही. काही घटना वा कमी वकुबाच्या व्यक्तींचा वापर करुन अकांडतांडव करुन मोदी व भाजपा यांची लोकप्रियता घटल्याचे भ्रामक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करुन स्वत:च निर्माण केलेल्या आनंदवनभुवनी गुंगीत रहाणे हेच त्यांना सध्या शक्य आहे व तेच ते करत आहेत. मुख्य विषयांकडचे लक्ष भलतीकडे वळवणे हे खरतर सत्ताधारी पक्षाच्या फायद्याचे असते त्या ऐवजी हे काम विरोधक करत आहेत हि आश्चर्याचीच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या कही अंशी असलेल्या यशाची पावती आहे.

सावरकरांची प्रतिमा मलिन करुन त्यांना काहीही हातात लागणार नाही, सावरकरांवर आचरट आरोप करुन मोदी वा भाजपा चिडेल, हिंदुत्ववाद्यांना चिडवुन त्यांच्या कडून काही आततायी कृत्य घडेल असे त्यांना वाटत असेल तो शुद्ध राजकिय़ मुर्खपणा आहे. कारण कॉंग्रेसने जसे ५०-६० वर्षे गांधीजींचे नाव वापरुन त्यांच्या महात्मेपणाचा सत्ता मिळवण्यासाठी दुरुपयोग केला तसा सावरकरांच्या नावावर अथवा विचारांवर मोदी वा भाजपा सत्तेवर आलेलीच नाही. त्यांना सावरकर हे गांधीजीं इतपतच आदरणीय आहेत, अनुसरणीय आहेतच असे नाही. त्यामुळे सावरकरांची प्रतिमा मलिन करुन उद्रेक वगैरे काही होण्याची शक्यता नाही. मागच्या वेळी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने अंदमानात सावरकरांचे स्मृतिचिन्हाबाबत तालिबानी वृत्तीचे प्रदर्शन घडवले होते तेव्हा अगदी पुण्यात कै.श्रीमती हिमानी सावरकर लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यांनाही साधारण दोन वेगवेगळ्या आकड्यांनुसार १००० किंवा ५००० इतकीच मते मिळली होती. त्यावेळी कै.प्रमोद महाजनांनी स्पष्टपणे सांगितले होते की सावरकरांचे नाव वापरुन मते मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्या नावावर मते मागण्याचा प्रश्नच येत नाही किंवा सावरकर कुटुंबातल्या व्यक्तीला ही पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही.
तरिही हा सावरकर द्वेष का होत आहे? तर याचे एकमेव कारण कॉंग्रेस व साम्यवादी सटपटले आहेत हे एकमेव कारण आहे. सावरकरांवर पातळी सोडून आणि खोटी व वाह्यात टिका करणे हे त्यांचे नैराश्य आणि दिवाळखोरी या व्यतिरिक्त काही नाही. महाराष्ट्रात तर या यामुळे यांना मतांसाठी फायदा न होता उलट लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा जास्त मलिन होत आहे. कारण गांधीजींवर हिन पातळीवर टिका करुन नथुरामवाद्यांचे जे नुकसान झाले तेच सावरकरांवर हिन पातळीवर टिका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
सावरकरांना भारतरत्न देणे न देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. शिवसेनेची मागणी या व्यतिरिक्त तसा कोणताही प्रकारे या गोष्टीचा मागमुसही प्रत्यक्षात दिसत नाही. अंदमानातले सावरकरांचे माजी उद्धट पेट्रोलियम मंत्र्याने उखडलेले स्मरणपट्टीका दोन वर्षे झाली तरी निर्माणाचे काम आरामात चालु आहे. भारतात स्वच्छता अभियान ते अमेरिकेत ओबामांना गांधीगीता देण्यापर्यंत मोदी सर्वत्र गांधीनामच जपत आहेत. अशावेळी सावरकरांविषयी द्वेष या तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचे नाव घेणाऱ्यांच्या मनात उफाळुन येणे हे अतिशय केविलवाणे चित्र आहे. ज्या पातळीचे पोरकट आणि उडाणटप्पु नेतृत्व त्यांना लाभले आहे त्याचा हा दृष्य परीणाम आहे.

सावरकरांची केली जाणारी बदनामी आणि आक्षेप यांना वेळोवेळी अभ्यासु व तथ्यांवर आधारीत उत्तरे सावरकरांच्या चाहत्यांनी वेळोवेळी दिली आहेत व पुढेही देत रहातील. शत्रू याबाबत अत्यंत कमकुवत असल्याने हे फारच सोपे काम आहे. प्रश्न फक्त प्रचारतंत्राचा आहे. त्यात मोदी वाकबगार आहेत. असल्या घटनांचे संधीत रुपांतर कसे करायचे ते त्यांना चांगले माहित आहे. गांधी, पटेलांच्या प्रतिमेचे त्यांनी कॉंग्रेसकडून स्वत:कडे हस्तांतरण करुन घेतलेच आहे, पण ज्या सावरकरांच्या नावावर मत मिळत नाहीत त्यांच्या बदनामीचा एक अदृष्य फायदाच त्यांना मिळणार आहे. सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकासारखे (Catalyst) आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही, पण प्रक्रीया घडवुन आणण्यात मात्र तो सहाय्यकारी होतो. उत्प्रेरक एकतर रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो अथवा कमी करतो पण स्वत: मात्र निर्लेप रहातो. सावरकरांचे विचार हे प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होताना दिसत नाहीत, त्यांचे नावही देशात सरसकट माहित नाही , १०० हून जास्त वर्षे त्यांच्या नावाचा व विचारसरणीचा विरोध , द्वेष आणि गैरसमज करुन देणे चालु आहे पण तरिही सावरकरांचे नाव मिटवणे विरोधकांना शक्य झाले नाही. उत्प्रेरक (Catalyst) म्हणून भारतीय राजकारणात सावरकरांचे असलेले अस्तित्व अढळ आहे.

- लेखक चंद्रशेखर साने
.......................xxx..........................

माझी वाचनयात्रा

वयाच्या साधारण ८ व्या वर्षापसून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग.शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण तो फारसा टिकला नाही. दहावीच्घ्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच.समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. केतकर आल्यावर मटा चा सोटा म्हनजे सोनिया टाईम्स झाला होता. मग आपोआप मटा सुटला.
मराठिची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी दहा पुस्तके :
.
१. कर्मयोग - स्वामी विवेकानंद
२. सावरकरांचा बुद्धीवाद एक चिकित्सक अभ्यास- शेषराव मोरे
३. समग्र सावरकर
४. भ्रम आणि निरास- डॉ. नरेंद्र दाभोळकर
५. सावरकरांचे समाजकारण- सत्य आणि विपर्यास- शेषराव मोरे
६. शोध भानामतीचा- शाम मानव
७. स्वामी विज्ञानानंद यांची साहित्यसंपदा
८. वीरधवल- नाथमाधव
९. उष:काल- ह.ना.आपटे
१०. योगवासिष्ठ (३ खंड )
-चंद्रशेखर साने

लोकशाही, पक्षिय राजकारण आणि सावरकर

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

Wednesday, March 2, 2016

टाळ्या दिल्यात मत नाही दिलित

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

गांधी हत्येनंतरही हिंदुमहासभेचे चार खासदार लोकसभेत गेले होते. जानेवारी १९५२ मध्ये झालेल्या या निवडणुकितले हिंदुमहासभेचे खासदार होते प्रा. विघ देशपांडे (गुणा व ग्वाल्हेर दोन्ही तून विजयी झाल्याने यातल्या ग्वाल्हेरच्या जागेचे त्यागपत्र दिल्यावर तेथुन परत हिंदुमहासभेचेच डॉ. ना.भा.खरे निवडुन गेले. तिसरे खासदार निर्मलचंद्र चट्टोपाध्याय. ( कम्युनिस्ट लिडर सोमनाथ चटर्जी यांचे वडील.) उत्तरप्रदेशातून राखीव मतदारसंघात हिंदुमहासभेचे कॅ. राम गरिबा व पाचव्या सौ. शकुंतला नय्यर अशी यांची नावे.
ग्वाल्हेर मधुन नंतर लेखादेवी उर्फ राजमाता विजयाराजे शिंदे यांना नंतर कॉंग्रेसने फोडुन मध्यप्रांतात हिंदुमहासभेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. पुढे त्या जनसंघात आल्या.
हिंदुमहासभेला नथुरामाच्या कृत्यामुळे काही अंशी नुकसान झाले तरी त्यापेक्षा इतर काही जास्त कारणे होती. जर संघ आणि जनसंघियांनी सुचवल्याप्रमाणे जनसंघ, रामराज्यपरिषद व हिंदुमहासभा हे तीन पक्ष एकाच नव्या पक्षात विलीन झाले असते तर जास्त फ़ायदा लवकर झाला असता.
नविन पक्षातल्या नावात हिंदू शब्द असू नये व इतर धर्मियांनाही नव्या पक्षात स्थान असावे या प्रस्तावास सावरकर अनुकूल नव्हते.
पुढे पुढे जनसंघाने राजकारण करावे आणि हिंदुमहासभेने धार्मिक व सामाजिक कार्य पहावे हा गोळवलकरांचा प्रस्तावही हिंदुसभेला मान्य झाला नाही.
नेहरू पटेलांनी या राजकीय वादाचा फ़ायदा घेतला याविषयी त्यांना दोष देता येत नाही . विरोधी पक्ष रक्तपात न करता नष्ट करता यावा म्हणुन त्यात फाटाफुट घडवणे वा तिला प्रोत्साहन देणे हा लोकशाही मार्ग होता, राजकीय चातुर्य होते, आर्थिक बळही होते.
संघाचा विस्तार गुरुजींच्या काळात कित्येक पटींनी वाढला. ताकद वाढलेल्या गुरुजींनी हिंदुमहासभेचा नाद सोडून १९७१ साली धार्मिक कार्यासाठी विश्व हिन्दू परिषदेची स्थापना केली. भारतिय मजदुर संग , वनवासी कल्याण आश्रम , सामाजिक समरसता मंच अशा कितीतरी प्रकारे संघ विस्तारत गेला.

तात्पर्य :- सावरकर लोकशाही वादी होते यात शंका नाही पण त्यांना लोकशाहीतले राजकारण, जनमताची मानसिकता व निवडणुका जिंकन्याचे तंत्र अजिबात कळत नव्हते. किंवा कसही करून निवडणुका जिकणे हे त्यांचे ध्येय नव्हते, प्रकृति व वयही नव्हते.

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...