Skip to main content

अख्खा हत्ती खाण्याची युक्ती

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन हिंडत असताना त्यास एक मेलेला हत्ती दिसला. तो बेहद्द खुष झाला. मेलेल्या हत्तीचे मांस आता त्याला खूप दिवस पुरणार होते. त्यास जिवंत ठेवणार होते.
पण तेवढ्यात त्यास सिंहाची डरकाळी ऐकु आली. कोल्हा चतुर होता. सिंहाला पाहताच तो नम्रपणे म्हणाला, या या महाराज आपलीच वाट पहात होतो, आपल्या साठीच मी या हत्तीची राखण करत थांबलो होतो. आपण जंगलाचे राजे, आपलाच या मांसावर हक्क !
वनराज खुष झाले, म्हणाले, तू माझा खरा नागरीक. पण आत्ता माझे पोट भरले आहे व तशीही मी दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो, तेव्हा तुझ्या एकनिष्ठेचे बक्षिस म्हणून हि शिकार मी तुला देऊन टाकतो.
कोल्हाने वाकुन नमस्कार केला आणि सिंह तेथून निघुन गेला.
कोल्ह्याने हत्तीचे निरिक्षण सुरु केले. हत्तीच कातड जाड आणि काळ केसाळ होत. कोल्ह्याच्याने ते एकट्याच्याने फाडणे अशक्य प्राय होते.
तेवढयात तिथे एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली.
कोल्हा हुशार होता, अजिबात न घाबरता तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वाघोबा, हि शिकार वनराज सिंहांनी केली आहे आणि मला ते राखण करण्यास सांगुन नदीवर स्नानास गेले आहेत, त्यांनी मला जो कोणी या शिकारीस तोंड लावेल त्याचे नाव सांगण्यास सांगितले आहे, विशेष करुन ते मला म्हणाले होते की त्यांना वाघाची फार चीड आहे, तु दिसलास तर मला लगेच सांगायला ये. तेव्हा तुला जर प्राणाची काळजी असेल तर त्वरित निघुन जा. ते ऐकताच वाघ सिंहाच्या भीतीने घाबरुन पळुन गेला.
आता हत्तीला कसे फाडावे याचा कोल्हा विचार करत असतानाच एक चित्ता तेथे आला. कोल्ह्याने विचार केला की श्रेष्ठास नैवेद्य दाखवुन, शूर पण दुष्ट वाघास श्रेष्ठाची भीती दाखवुन आपण काम साधले. आता आपल्यास वरचढ पण अन्य दोघांच्या तुलनेने शक्तीत कनिष्ठ अशा या चित्त्यास थोडी लालुच दाखवावी, हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे काम याच्याकडून करुन घ्यावे, कारण याचे दात व नखे फार अणकुचीदार आहेत.
असा विचार करुन तो चित्त्यास म्हणाला अरे भावा, हि शिकार सिंह महाराजांनी केली आहे व मला राखण करण्यास बसवले आहे.
चित्ता म्हणाला असे असेल तर येथुन पळुन जाणेच बरे.
कोल्हा म्हणाला, तू असा घायकुतीला येऊ नकोस, तू माझा भाऊ आहेस, तू फार भुकेलेला दिसतोस. मी असे करतो , एका बाजूला जाऊन मी सिंह येत नाही ना पहातो तोपर्यंत तू पोटभर खाऊन घे.
चित्ता भुकेला होताच, त्याने कोल्ह्याचे हे म्हणणे मान्य करुन हत्ती ला फाडण्यास सुरुवात केली. हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे आपले पुरेसे काम होताच कोल्हा ओरडला, अरे मुर्खा पळ पळ, महाराज येत आहेत. चित्ता घाबरुन पळुन गेला.
आता कोल्हा निवांत पणे चित्त्याने फाडलेल्या भागाचे मांस खाऊ लागला. तेवढयात दुसरा एक भुकेलेला आणि संतापलेला कोल्हा हत्तीचे मांस खाण्यासाठी धावुन आला.
कोल्ह्याने विचार केला श्रेष्ठास सामाने, दुष्टास भेदाने , कनिष्ठ चित्त्यास दामाने म्हणजे लालच दाखवुन त्यांच्यावर आपण मात केली.
पण हा कोल्हा आपल्याला तुल्यबळ आहे, नीतीशास्त्राप्रमाणे आपण याच्याशी संघर्ष आणि लढाई करणेच शौर्याचे लक्षण आहे. असा विचार करुन त्यानेही त्या कोल्ह्यावर उलट चढाई करुन त्यास पळवुन लावले.
अशा प्रकारे चतुर कोल्ह्याने राजनीतीशास्त्राने सांगितलेल्या साम, दाम, भेद व दंड अशा चारही युक्त्यांचा वापर करुन आपले अन्न स्वकष्टाने प्राप्त केले व बराच काळ आपला चरितार्थ सुखाने चालवला.
-चंद्रशेखर साने
पंचतंत्र कथा

Comments

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...