Thursday, February 16, 2017

राष्ट्रपिता नाही महात्मा


माझा गांधी विचार आणि गांधी वाद यांना तीव्र विरोध असला तरी त्यांना उद्देशुन महात्मा हा शब्द वापरायला माझ्या दृष्टीने हरकत नाही कारण तो ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे.

पण एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपिता म्हणताना शंभर नाही लाख वेळा विचार करावा. राष्ट्र हि भावना आणि आणि ती अमर्त्य बाब आहे. तिचा कोणी पिता असु शकत नाही. प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे, शब्द ढिलेपणाने कसाही वापरणे हे त्या शब्दाचे आणि आणि त्या शब्दामागे असलेल्या भावनेचे अवमुल्यन आहे. तेव्हा ऐर्यागैऱ्या कोणालाही राष्ट्रपिता असे संबोधन करु नये अस मला वाटत.

इतिहासाचे अभ्यासक , विश्लेषक गांधींना श्रीयुत गांधी किंवा राजमान्य राजेश्री गांधी किंवा गांधीजी असे म्हणु शकतात. गांधीभक्त महात्मा म्हणु शकतात. पण त्यांना वा अन्य कोणाही व्यक्तीला राष्ट्रपिता संबोधण्याला मात्र माझा तीव्र आक्षेप आहे.

गांधी राजकारणात येण्यापुर्वीच राष्ट्र अस्तित्वात होते हे सिध्द करण्यास फार लांबची साक्ष कशाला? गांधीजींचे राजकिय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनीच गांधी राजकारणात येण्यापुर्वी पासूनच हे राष्ट्र अस्तित्वात होते , आहे हे नेमस्तांनी केलेल्या कार्याचे वर्णन करताना स्पष्ट केले होते. ते म्हणतात,

" आजपर्यंत नेमस्त रितीने केलेल्या राजकिय चळवळीमुळे, भारत हे एक राष्ट्र असून येथील जनता मुक्त होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करीत आहे, ही गोष्ट आता सर्वांना सुपरिचित झालेली आहे.राष्ट्रीय पातळीवर लोकमत तयार झाले आहे; वेगवेगळ्या प्रांतांमध्ये निकटचे भावबंध निर्माण झाले असून त्यांच्या मध्ये ऐक्य साधले आहे; आपल्या समान उद्दीष्टांच्या जातिधर्माचे आणि विचारांचे भेद कमी येऊ लागले आहेत; आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाची व प्रतिष्ठेची जाणीव समाजाच्या सर्व थरात निर्माण झाली आहे......"

थोडक्यात देश पारतंत्र्यात असु शकतो पण राष्ट्र पारतंत्र्यात नसते फक्त राष्ट्रीय जाणिवा कमी-जास्त बळकट असतात. राष्ट्र बळकट झाले की देश - पदेश स्वतंत्र होतात. पण राष्ट्राचे अस्तित्व हे असतेच, कोणीही मर्त्य व्यक्ती तिचा पिता असु शकत नाही.

गोखल्यांनी जी स्थिती वर्णन केली आहे त्याचा विचार करता टिळकांनंतर कॉंग्रेसचे मुख्य नेतृत्व करणाऱ्या श्री. गांधींना हिंदु-मुस्लीम ऐक्य साधून एकराष्ट्रियत्व निर्माण करण्यात संपुर्ण अपयश आले. त्यांचे धोरण संपुर्ण चुकले व त्याची किंमत हिंदुंना अतिशय भीषण प्रमाणात मोजावी लागली हे स्वच्छ आहे. आपल्या मुळे इतका हिंसाचार आणि रक्तपात झाला याबदाल एखादी व्यक्ती सुखो वा दु:खोवा समान मानुन स्थितप्रज्ञतेचा आविष्कार दाखवुन महात्मा ठरु शकते, डायरेक्ट ऍक्शन करणाऱ्या शत्रु देशाला पंचावन्न कोटीं रुपये दान देऊन, शत्रूमित्राच्या कल्पनेत अद्वैत दाखवुन तटस्थ नीतीमुल्ये दर्शवुन महात्मेपदाला आणि संतपदाला पोचु शकते. पण अशी व्यक्ती राष्ट्रपिता कशी असु शकते? अंध भक्ती किती करावी याला सुध्दा एक मर्यादा आहे. एका स्खलनशील , हिमायलाएवढ्या चुका करणाऱ्या मर्त्य मानवास राष्ट्रपिता म्हणणे हा राष्ट्रभावनेवर अत्याचारच आहे. जेव्यढ्या लवकर हे संबोधन करणे बंद होईल तेवढा राष्ट्र भावनेचा सन्मान होईल.
© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...